Kajol Talks About Her Married Life : लोकप्रिय अभिनेत्री काजोल व अभिनेता अजय देवगण ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडी आहे. या जोडीने १९९९ मध्ये लग्नगाठ बांधली होती. गेली अनेकवर्षे हे दोघे एकमेकांसह सुखाचा संसार करत आहेत. या जोडीला एक मुलगी व मुलगा अशी दोन मुलं आहेत. अशातच नुकतंच काजोलने एका मुलाखतीमध्ये अजय देवगण आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल सांगितलं आहे.
काजोलने ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या दोघांचा स्वभाव एकमेकांपेक्षा वेगळा असल्याचं सांगत याचा त्यांच्या वैवाहिक जीवनात फायदा झाल्याचं म्हटलं आहे. काजोल म्हणाली, “अजय व मी आम्ही दोन वेगळ्या स्वभावाची माणसं आहोत. आमचं लग्न कदाचित खूप आधीच मोडलं असतं, पण आम्ही एकमेकांपासून खूप वेगळे असल्याने आम्हाला या गोष्टीची मदत झाली.”
काजोल पुढे म्हणाली, “मी बऱ्याचदा असं म्हणते की, दोन वेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र आल्यानंतर खूप चांगलं नातं निर्माण होतं. आपण आपल्या जोडीदाराला समजून घेणं, त्यांच्या चुका माफ करणं खूप गरजेचं असतं.” काजोल पुढे म्हणाली, “आम्ही कधीच डेट नाईटला वगैरे गेलो नाही. आम्ही नेहमी सर्व कुटुंबीयांसह एकत्र वेळ घालवतो. बऱ्याचदा असं होतं की अजय त्याच्या शूटिंगसाठी बाहेर असतो किंवा कामानिमित्त कुठेतरी प्रवास करत असतो; तर कधी मी माझ्या कामात व्यग्र असते. त्यामुळे जितका एकत्र वेळ घालवता येईल तितकं आम्ही आमच्या कुटुंबीयांसह एकत्र राहण्याचा प्रयत्न करतो.”
काजोलला जेव्हा त्यांचं नातं रोमँटिक आहे की ते एकमेकांबरोबर मित्रांसारखे असतात असं विचारण्यात आलं, तेव्हा ती म्हणाली, “आता लग्नाला इतकी वर्षे झाली आहेत, त्यामुळे सहाजिकच अजयचं नाव घेतल्यानंतर पूर्वीसारखं लगेच चेहऱ्यावर हसू येतं वगैरे असं काही होत नाही.”
काजोल व अजय देवगण यांनी १९९९ मध्ये लग्नगाठ बांधली होती. ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटवर काम करताना हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्याआधी ‘इश्क’ चित्रपटात या जोडीने एकत्र काम केलं होतं आणि तेव्हापासून ते एकमेकांना ओळखू लागले होते. आज हे दोघे बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक मानले जातात.