Main Hoon Na Fame Actor : लोकप्रिय अभिनेता शाहरुख खानचा ‘मैं हू ना’ हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. त्यामधील शाहरुख खान व सुश्मिता सेन यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. परंतु, या चित्रपटात अजून एक जोडी होती ज्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. ‘मैं हू ना’ या चित्रपटात अमृता राव व झायेद खान यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्या काळी या जोडीनंसुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

‘मैं हू ना’ मधून शाहरुख खानसह झळकलेला अभिनेता म्हणजे झायेद खान. तो या चित्रपटातून खऱ्या अर्थानं प्रसिद्धीझोतात आलेला. त्याकाळी त्याची चित्रपटातील भूमिका अनेकांना आवडलेली. या चित्रपटात त्यानं शाहरुख खानच्या धाकट्या भावाची लक्ष्मणची भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्याच्या भूमिकेचा मोठा चाहतावर्ग निर्माण झालेला. व्यावसायिक आयुष्यासह अभिनेता त्यावेळी त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत होता. याचं कारण म्हणजे अभिनेत्यानं वयाच्या अवघ्या २५ साव्या वर्षी लग्नगाठ बांधली होती.

झायेद खाननं त्याची जवळची मैत्रीण मलायका पारेखसह लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी त्यानं ‘मैं हू ना’, ‘दस’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. अभिनेत्याचा मोठा चाहतावर्ग तर होताच; परंतु यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. झायेद खानचा फिमेल फॅन फॉलोईंग खूप मोठा होता. त्यामुळे त्याच्या बायकोला या गोष्टीचा त्रास होत असे, असं त्यानं सांगितलं आहे. त्याबद्दल अभिनेत्यानं सिद्धार्त कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. तो म्हणाला, “माझा फिमेल फॅन फॉलोईंग जास्त असल्यानं माझ्या बायकोला यामुळे थोडा त्रास व्हायचा. तिला कधी असुरक्षित वाटलं नाही; पण तिला माझ्याशी याविषयी अनेकदा बोलावंसं वाटायचं आणि ते साहजिक आहे”.

अभिनेता त्याच्या प्रेमकथेबद्दल पुढे म्हणाला, “मी जेव्हा तिला (मलायकाला) पाहिलं तेव्हाच ठरवलं की, मला या मुलीबरोबर लग्न करायचं आहे. तेव्हा माझं तिच्याशी बोलणंही झालं नव्हतं. तिला पाहताच मला हे जाणवलं होतं की, हीच माझी बायको असणार आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झायेद खाननं या मुलाखतीमध्ये त्यानं वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानं अनेकांनी त्याला विरोध केल्याचं सांगितलं आहे. तो म्हणाला, “बरेच लोक माझ्या या निर्णयाच्या विरोधात होते. तेव्हा मला बऱ्याच चित्रपटासांठी विचारणा व्हायची आणि अशा वेळी मी लग्न करत आहे हे समजल्यानतंर लोक मला म्हणायचे की, तुझा चाहतावर्ग कमी होईल, चित्रपट मिळणार नाहीत. आणि असं खूप काय बोललं गेलं. पण मी कोणाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. आणि आजही मला २५ व्या वर्षी लग्न केल्याचा पश्चात्ताप नाहीये”.