बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असतात. बॉलिवूड इंडस्ट्रीतील समस्यांवर त्या नेहमीच स्पष्ट बोलताना दिसतात. आपलं खासगी आयुष्य ते बॉलिवूडमधील संघर्ष या सगळ्यावरच त्यांनी याआधी भाष्य केलं आहे. त्यांचा 'वध' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्या आधी दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी बॉलिवूडमध्ये टिकून राहायचं असेल तर तुम्हाला निर्लज्ज होता यायला हवं असं वक्तव्य केलं आहे. नीना गुप्ता यांनी या मुलाखतीत त्यांना आलेला एक अनुभव शेअर करत असतानाच, 'या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहायचं असेल तर काही वेळा तुम्हाला तुमची तत्व सोडावी लागतात आणि निर्लज्ज व्हावं लागतं.' असं मत मांडलं आहे. नीना गुप्ता म्हणाल्या, "माझा खूप चांगला मित्र एक चित्रपट बनवत होता. जेव्हा मला समजलं की तो शूटिंगसाठी लंडनला गेला आहे. तेव्हा मी त्याला फोन केला. त्याआधी मी त्याच्याबरोबर 'लेडीज स्पेशल' हा चित्रपट केला होता." आणखी वाचा- “आपल्या समाजात…”, चित्रपटांमुळे हिंसेला प्रोत्साहन मिळत असल्याच्या आरोपांवर नीना गुप्तांनी मांडलं मत नीना गुप्ता पुढे म्हणाल्या, "मला जेव्हा समजलं की माझ्या मित्राच्या चित्रपटातच माझ्या वयाला अनुरुप अशी एक व्यक्तीरेखा आहे आणि त्याने त्या भूमिकेसाठी दुसऱ्या कोणाला तरी कास्ट केलं आहे. तेव्हा मी त्याला कॉल केला आणि विचारलं, "अरे तू मला का नाही घेतलं?" त्यावर त्याने मला उत्तर दिलं, माझ्या लक्षात नाही राहिलं की तू ही भूमिका साकारू शकतेस. यावरून मी एक शिकले की तुम्हाला लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी बोलावं लागेल. एका साच्यात राहून बॉलिवूडमध्ये काम करणं कठीण आहे." आणखी वाचा- आमिर खानने केलेलं ‘या’ मुकपटात काम; नीना गुप्ता होत्या प्रेयसीच्या भूमिकेत तर आलोक नाथ यांनी साकारला खलनायक 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या या मुलाखतीत नीना गुप्ता म्हणाल्या, "या प्रसंगातून मी खूप काही शिकले. बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला निर्लज्ज व्हावं लागतं आणि तुम्ही हे काम करु शकता हे सर्वांना वारंवार सांगावं लागतं. त्याशिवाय तुम्हाला कोणी काम देणार नाही. स्वतःचा डंका वाजवावा लागतो. या कामात तुम्ही उत्कृष्ट आहात हे सांगावं लागतं." दरम्यान २०१७ मध्ये नीना गुप्ता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काम मागितलं होतं. त्यानंतर त्यांनी 'बधाई हो' या चित्रपटात उत्कृष्ट काम करत स्वतःला सिद्ध केलं होतं. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्यानंतर नीना यांच्याकडे कामाच्या बऱ्याच ऑफर येऊ लागल्या होत्या.