शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा एक प्री-रिलीज इवेंट आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शाहरुखच्या या आगामी चित्रपटाची गाणीदेखील प्रदर्शित करण्यात आली. आता नुकताच ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे ज्याची प्रेक्षक फार आतुरतेने वाट बघत होते.

ट्रेलरला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला असून शाहरुखच्या वेगवेगळ्या लूक्सची चांगलीच चर्चा होत आहे. ‘जवान’ हा पठाणचेही सगळे रेकॉर्ड मोडीत काढणार अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. ‘जवान’ची आणखी एक खासियत म्हणजे या चित्रपटातील दाक्षिणात्य कलाकार. गेल्या काही दिवसांपासून हा ट्रेंड सध्या पाहायला मिळत आहे. हिंदी चित्रपटात दाक्षिणात्य कलाकार आणि दाक्षिणात्य चित्रपटात हिंदी कलाकार हे हमखास दिसू लागले आहेत.

आणखी वाचा : “१३ वर्षांपूर्वी मी ‘मन्नत’बाहेर…” शाहरुख खानबद्दलची ‘ती’ आठवण शेअर करताना अ‍ॅटली झाला भावूक

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये हा प्रयोग सर्रास पाहायला मिळत आहे. एखाद्या चित्रपटात साऊथचे कलाकार घेऊन पॅन-इंडिया लेवलवर चित्रपट प्रदर्शित करणं ही स्ट्रॅटजी सध्या बॉलिवूडकर वापरत आहे. ही सुरुवात एसएस राजामौलीपासून सुरू झाली. ‘बाहुबली’सारखा चित्रपट त्यांनी करण जोहरला हाताशी घेऊन साऱ्या जगभरात पोहोचवला, तर त्यांच्या ‘आरआरआर’च्या प्रमोशनमध्ये आमिर खान आणि सलमान खानसारखे स्टार सहभागी झाले होते. आपल्या ‘आरआरआर’मध्ये तर त्यांनी आलिया भट्ट आणि अजय देवगणसारख्या बॉलिवूड कलाकारांनाही महत्त्वाच्या भूमिका दिल्या.

चिरंजीवीसारख्या मेगास्टारनेही सलमानला आपल्या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून घेतलं. पाठोपाठ सलमानच्याही ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये व्यंकटेश, राम चरण अन् पूजा हेगडेसारखे दाक्षिणात्य कलाकार आपल्याला पाहायला मिळाले. हीच गोष्ट आता ‘जवान’मधून पाहायला मिळत आहे. ‘जवान’मध्ये मुख्य व्हिलनच्या भूमिकेत विजय सेतुपती आहे, तर मुख्य अभिनेत्री नयनतारा आहे. याबरोबरच थलपती विजयचाही या चित्रपटात कॅमिओ असल्याची चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ट्रेंडवरुन एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे व्यावसायिक गणितं समोर ठेवता बॉलिवूडमधील मंडळी दाक्षिणात्य कलाकारांना चित्रपटात घेऊन त्यातून जास्तीत जास्त आर्थिक फायदा कसा करून घेता येईल याचा विचार करत आहेत. चित्रपट देशभरातील सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा हा मुद्दा तर आहेच. याबरोबरच या बिझनेस स्ट्रॅटजीमुळे गेल्या काही वर्षात हिंदी चित्रपटसृष्टीला झालेलं नुकसान भरून काढायचा हा प्रयत्न हिंदी चित्रपटसृष्टीला कितपत फायदेशीर ठरेल ते येणारा काळच ठरवेल.