भरत जाधव हा मनोरंजनसृष्टीतील बहुआयामी अभिनेत्यांपैकी एक आहे. आतापर्यंत विविध नाटक-मालिका-चित्रपटांमध्ये काम करत त्याने प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवलं आहे. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. भरत जाधव सध्या मराठी रंगभूमीवर कार्यरत आहेत. रत्नागिरीत नाट्यप्रयोगादरम्यान भरत जाधवला एक भीषण अनुभव आला आहे. या अनुभवानंतर त्याने रत्नागिरीत पुन्हा प्रयोग न करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन प्रयोगादरम्यानच त्याने हात जोडत रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही, असे म्हटले आहे. भरत जाधवचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काल रात्री रत्नागिरीत भरत जाधवच्या ‘तू तू मी मी’ या नाटकाचा प्रयोग होता. मात्र, नाट्यगृहात AC आणि साउंड सिस्टीम नव्हती. त्यामुळे भरत जाधव नाराज झाला. “AC नसल्याने काय होतं हे आमच्या भूमिकेतून पाहा,” अशी कळकळीची विनंती भरत जाधवांनी प्रेक्षकांना केली. याशिवाय प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकतात, रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही, असं भरत जाधव यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत जाहीर केलं.

गेल्या काही महिन्यांपासून भरत त्याच्या कुटुंबीयांबरोबर कोल्हापूरला राहत आहे. त्याच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत होता, त्याच्या नाटकांचे प्रयोगही हाऊसफुल्ल होत होते. पण अशातच त्याने कोल्हापूरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे चाहते अवाक् झाले. हा निर्णय घेण्यामागे काय विचार केला होता याचा खुलासा त्याने काही दिवसांपूर्वी केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरत जाधव म्हणालेला “मुंबई हे शहर आता बिझनेस हब झाले आहे. मुंबईच्या सध्या असलेल्या वेगाशी जुळवून घेणे मला कठीण वाटत आहे. त्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी माझे वय सरत चालले आहे. परंतु आपल्याजवळ पैसे हवेत आणि आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे, म्हणून मी मुंबईबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. पैसे तर कमवायचे, पण खर्च कमी करायचा, असे मी ठरवले. या सगळ्या आर्थिक बाबींचा विचार करून मी कोल्हापूरला स्थायिक होण्याचे ठरवले. आम्ही तिथे राहावे, अशी माझ्या आईची इच्छा होती म्हणून आम्ही तिथे राहायला गेलो,” असे भरत जाधव म्हणाला.