Marathi Actors Reaction On RCB Wins : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने तब्बल १७ वर्षांनी आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. RCB च्या विजयानंतर मैदानावरच विराट कोहलीला अश्रू अनावर झाले होते. अंतिम सामन्यात पंजाब किंग्जवर ६ धावांनी मात करत बंगळुरूने आयपीएलच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे.

यानिमित्ताने आरसीबी संघाचा माजी कर्णधार आणि पहिल्या हंगामापासून संघाचा भाग असलेल्या विराट कोहलीचं आयपीएल चॅम्पियन व्हायचं स्वप्न अखेर साकार झालं. संपूर्ण देशभरातून सध्या RCB टीमचं कौतुक करण्यात येत आहे. बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातील कलाकारांनी विराटच्या टीमवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

RCB च्या विजयानंतर मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी विराट कोहलीचं कौतुक करत पोस्ट शेअर केल्या आहेत. गौरव मोरे, पुष्कर जोग, पियुष रानडे, अनघा अतुल, रुचिरा जाधव, योगिता चव्हाण, शुभंकर तावडे या सगळ्या कलाकारांनी पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

तर, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप विराटबद्दल लिहितो, “या माणसाला खूप प्रेम…#kohlipaglu…विराट तू मला संयम, समर्पण, निष्ठा, आवड आणि स्वत:वर भरपूर विश्वास ठेवायला शिकवलंस…धन्यवाद कोहली.”

प्रसिद्ध लेखक क्षितीज पटवर्धनने इन्स्टाग्राम स्टोरीला विराट व एबी डिविलियर्स तसेच विरुष्काचा एकमेकांना मिठी मारतानाचा फोटो कोलाज करून शेअर केला आहे. यामध्ये कोहली भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

“तुम्ही फक्त ट्रॉफी जिंकण्यासाठी खेळू नका…तुम्ही कायम या मिठीसाठी खेळा…केवळ विराटच नाहीतर सचोटी, निष्ठा, संयम आणि पाठपुरावा या सगळ्या मूल्यांचा आज विजय झालाय” अशी पोस्ट शेअर करत क्षितीजने RCB चं कौतुक केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ९ विकेट्स गमावत १९० धावा केल्या होत्या. बंगळुरूने पंजाबसमोर १९१ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य गाठण्यात श्रेयर अय्यरच्या संघाला अपयश आलं आणि तब्बल १७ वर्षांनी आरसीबीने आयपीएलच्या चषकावर आपलं नाव कोरलं.