शरद पोंक्षे मराठी सिनेसृष्टीतील असे अभिनेते आहेत जे नेहमीच राजकीय, सामाजिक घडामोडींवर स्पष्ट वक्तव्य करत असतात. अशातच नुकतच त्यांनी त्यांच्या खाजगी आयुष्यातील एक अनुभव सांगितला आहे. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पोंक्षेंना, ” तुम्ही म्हणालात की तुमचे फार मित्र नाही आहेत पण तरी आतापर्यंत तुम्हाला कधी खोट्या माणसांचा सामना करावा लागला आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता.
शरद पोंक्षे यावर त्यांचा अनुभव सांगत म्हणाले, “अशी खूप माणसं आहेत. मी पूर्वी १-२ वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण लक्षात आलं की नाही त्यांच्या डोळ्यांवर तसा चष्माच आहे. आणि तो चष्मा काढायला ते तयार नाहीत. म्हणून मला असं वाटतं की मग नको तू तुझ्या आयुष्यामध्ये आनंदी राहा मी माझ्या आयुष्यामध्ये आनंदी राहतो. आपण बोलायलाच नको. त्या माणसांवर मी कायमची फुल्ली मारतो”.
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पोंक्षे यांना यासह असा ही प्रश्न विचारण्यात आला होता की, “तुमच्या स्पष्टवक्तेपणाचा किंवा तुमच्या या स्वभावाचा तुम्हाला कधी तोटा झाला आहे का?” यावर ते म्हणाले होते, “माझ्या या स्वभावाचा मला खूप तोटा होतो. अनेक लोकांना मी नको असतो. बऱ्याचदा पुरस्कार सोहळ्यांना मला आमंत्रित केलं जात नाही. त्यांना भीती वाटते की हा काय बोलेल. पण, मला त्याबद्दल काही वाटत नाही. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये वाटायचं की आपल्याला का नाही बोलवत. पण, आता मला कळलं की हे सगळं खोट आहे. जशी नाटकातील आई खोटी असते, बाबा खोटे असतात, नाटकातील नाती, सेट सगळं खोटं असतं; तसंच इथली बरीच माणसं खोटी असतात. खोटं वागतात, खोटं बोलतात आणि समोर असलो की, ते माझ्याशी बोलण्यासाठी किती उत्साही आहे असं दाखवतात.”
शरद पोंक्षे याबाबत बोलताना पुढे म्हणाले, “मला फार मित्र पण नाहीत आणि नकोच, त्यांचं काय करायचं आहे. ठराविक पाच-साह मित्र आहेत. ‘बंजारा’च्या निमित्ताने दोन अतिशय छान मित्र झाले. जी खूप खरी, आंतरबाह्य स्वच्छ माणसं आहेत. अशाच माणसांबरोबर माझी मैत्री होऊ शकते. आमची आधीपासूनच मैत्री होती, पण या चित्रपटाच्या निमित्ताने ती आणखी घट्ट झाली. ते दोन मित्र म्हणजे एक सुनील बर्वे आणि एक भरत जाधव. कारण ही दोन्ही चांगली माणसं आहेत.”