Anshuman Vichare on Struggling Day’s : कलाकार मंडळी बऱ्याचदा करिअरच्या सुरुवातीला नवीन असताना आलेले अनुभव आणि किस्से अनेक मलाखतींमधून सांगत असतात. प्रत्येक कलाकाराचा एक वेगळा स्ट्रगल आपल्याला त्यामधून ऐकायला मिळत असतो. अशातच प्रसिद्ध अभिनेता अंशुमन विचारेनेही त्याच्याबरोबर घडलेल्या एका प्रसंगाबद्दलची माहिती नुकतीच एका मुलाखतीमधून दिली आहे.

अंशुमनने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्याने अनुभवलेल्या कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. अंशुमन मुलाखतीमध्ये म्हणाला, “आमचा श्रीवर्धनला प्रयोग होता. तो एक कॉन्ट्रॅक्ट शो होता आणि आमचा पहिलाच शो असल्याने माझ्याकडे आणि मित्राकडे ५०-५० रुपये, असे १०० रुपये होते; पण आम्ही ते खर्च केले. आणि नेमका तेव्हाच नाटकाचा कॉन्ट्रॅक्टर पळून गेला. शोच्या तिकिटांचा वगैरे सगळा गोंधळ झाला आणि तेव्हा आमच्याकडे पैसेच नव्हते. त्यामुळे आता काय करायचं हेच आम्हाला समजत नव्हतं”.

अंशुमन पुढे म्हणाला, “आम्ही लोकांच्या घरी जाऊन त्यांना सांगितलं की, आमचं नाटक आहे तुम्ही ते पाहायला या वगैरे. आणि तेव्हा एकदा मी त्यांच्याकडे काही खायला आहे का, असं विचारलं. मी त्यांना म्हटलं की, भूक लागली आहे. काही खायला आहे का? आणि मग आम्ही त्या एका घरामध्ये जेवण केलं. त्यांना आमच्या नाटकाला बोलावलं. असं आम्ही खूप काही केलं आहे”.

अंशुमनने हा प्रसंग त्याच्या करिअरच्या सुरुवातीला १९९५ दरम्यान घडल्याचं सांगितलं आहे. करिअरच्या सुरुवातीला अनेक कठीण प्रसंगांचा धीराने सामना करीत पुढे त्यानं अनेक नाटक, कार्यक्रम, चित्रपटांतून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर त्याच्या अभिनयाची छाप सोडली. त्यामुळेच आज तो मराठीतील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहे.

अंशुमनने ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘फू बाई फू’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अशा लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांमध्ये काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अंशुमन सध्या ‘पाहिले न मी तुला’, ‘वस्त्रहरण’ या नाटकांमधून पाहायला मिळतोय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनयाव्यतिरिक्त अंशुमन सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो. बायको व मुलीबरोबरचे व्हिडीओ तो सोशल मीडियावरून शेअर करीत असतो. बऱ्याचदा तो कोकणामधील त्याच्या गावातील व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर करीत असतो.