Atul Todankar Brain Hemorrhage : मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे अतुल तोडणकर. विनोदी भूमिकांमुळे अतुल कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे. अतुलला गेल्यावर्षी २१ जानेवारी २०२४ रोजी ब्रेन हॅमरेजचं निदान झालं होतं, याबद्दल अभिनेत्याने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती.

अशातच आता अतुलने तेव्हा नेमकं काय झालं होतं? याबद्दल सविस्तरपणे सांगितलं आहे. हंच मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अतुलने त्याला या आजाराचं निदान होण्याआधीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. तसंच या आजारातून आई-वडिलांची पुण्याई आणि रंगभूमीमुळे मी वाचल्याचे मतही अतुलने यावेळी व्यक्त केलं.

याबद्दल अतुल असं म्हणाला, “एका लगाची पुढची गोष्ट या नाटकाचे पुण्यात दोन प्रयोग होते. एक बालगंधर्वला होता आणि त्यानंतर आम्ही कोथरूडला दुसऱ्या प्रयोगासाठी आलो. तेव्हा दोन प्रयोगांदरम्यानच्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यादरम्यान मोकळ्या वेळेत मस्करी वगैरे सुरू होती. तेव्हा मी माझी रक्तदाबाची औषधं घेतली. त्यानंतर प्रयोगाआधी मला हाताला खाज येऊ लागली. म्हणजे मुंग्या आल्यासारखं वाटत होतं. ते प्रशांत दामलेंनी पाहिलं.”

अतुल तोडणकर इन्स्टाग्राम पोस्ट

यानंतर त्याने सांगितलं, “यावरून प्रशांत दामले आणि माझ्यात मस्करी सुरू होती. त्यानंतर मी नाटकासाठी एन्ट्री घेतल्यानंतर मला असं कळलं की, मला एकच पाय आहे. माझ्या डाव्या पायाला संवेदनाच जाणवत नव्हती. त्यामुळे हे काहीतरी भीषण असल्याचं माझ्या लक्षात आलं. मग मी प्रेक्षकांना हात जोडून सांगितलं की, मी हा प्रयोग करू शकत नाही.”

यापुढे अतुलने सांगितलं, “तेव्हा प्रेक्षकांमधील एक डॉक्टर आले आणि त्यांनी माझं वजन वगैरे बघून सांगितलं की, कदाचित हृदयासंबंधित काहीतरी असेल. त्यानंतर मला लगेच अ‍ॅडमिट करण्यात आलं. तेव्हा मी पहिल्यांदा व्हीलचेअरवर बसून स्टेजवरुन एक्झिट घेतली. जे माझ्या मनाला खूप लागलं. त्यानंतर मी कोथरूडला अ‍ॅडमिट झालो.”

यापुढे अतुल म्हणाला, “माझ्यावर उपचार सुरू झाल्यानंतर मला सांगण्यात आलं की, तेव्हा माझ्या मेंदूतली एक रक्ताची शीर तुटली आहे. ज्यामुळे मेंदूच्या संवेदनशील भागावर त्यातून रक्त पडलं आणि त्यामुळे मला हा त्रास होत आहे. तसंच यामुळे मला अर्धांगवायूचा झटका येण्याची सुरुवातही झाली होती. फक्त त्याचा तितकासा परिणाम नव्हता. जर झालं ते असतं; तर माहीत नाही पुढे काय झालं असतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबद्दल पुढे अतुल सांगतो, “यातून मी वाचलो आणि यात माझी नाहीतर, माझ्या आई-वडिलांची आणि रंगभूमीची पुण्याई आहे असं मला वाटतं. कारण हेच जर घरी झालं असतं, तर मुंग्या येत आहेत असं समजून मी झोपलो असतो. उद्या बघू काय होतं हा विचार केला असता. पण रंगभूमीवर होतो; म्हणून मला कळलं की काही मोठी समस्या आहे. मग अ‍ॅडमिट झालो आणि मग तीन दिवसांनी घरी आलो.”