मुंबई : ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गाचे काम एप्रिल २०२० नंतर अंतिम टप्प्यात येणार आहे. या मार्गातील रुळांच्या तांत्रिक कामांसाठी प्रत्येकी १० तासांचे १२ मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. एप्रिलनंतर टप्प्याटप्यात हे ब्लॉक घेऊन रुळांची कामे त्वरित उरकण्यावर भर असेल, अशी माहिती ‘एमआरव्हीसी’तील (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मेल-एक्स्प्रेस गाडय़ांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करण्यासाठी मध्य रेल्वेवर ‘एमआरव्हीसी’मार्फत पाचवा-सहावा मार्ग उभारण्यात येत आहे. त्यामुळे लोकल गाडय़ांसाठी प्रवास सुकर होणार आहे. आतापर्यंत कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुल्र्यापर्यंत पाच आणि सहाव्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.

गेल्या दहा वर्षांत ठाणे ते दिवा पाच आणि सहाव्या मार्गाच्या कामाला अनेक वेळा अंतिम मुदत देण्यात आली. मार्च २०१९ ही अंतिम मुदत असतानाही त्यात बदल झाला आणि डिसेंबर २०२० किंवा मार्च २०२१ पर्यंत मार्गिका पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुंब्राजवळही दीड किलोमीटरचा उन्नत मार्ग व अन्य कामे सुरू आहेत. उन्नत मार्गासाठी गर्डर राज्याबाहेरून आणले जाणार आहेत. त्यालाही लवकरच सुरुवात होईल.

मोठी तांत्रिक कामे : या मार्गिकेदरम्यान रुळांची ‘कट-कनेक्शन’ अशी मोठी तांत्रिक कामे करावी लागणार आहेत. यात नवीन मार्गातील रुळ हे जुन्या मार्गातील रुळांना जोडण्यात येतात. अशी नऊ ‘कट-कनेक्शन’ असून त्यासाठी मोठे मेगाब्लॉक घ्यावे लागतील, असे सूत्रांनी सांगितले. यासाठी प्रत्येकी दहा तासांचे १२ मेगाब्लॉक घेण्याचे नियोजन केले आहे. एप्रिलनंतर हे ब्लॉक टप्प्याटप्यात रविवारीच घेण्यात येतील. पावसाळ्यात ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यानंतर मात्र पुन्हा ब्लॉक घेऊन काम केले जाईल. त्यामुळे या कामांचा काही प्रमाणात प्रवाशांना फटका बसण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.