योग्य खबरदारी घेऊन महाराष्ट्रातली मंदिरं उघडली पाहिजेत अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. जर खबरदारी घेऊन महाराष्ट्रातले मॉल्स उघडू शकतात तर मंदिरं का उघडली जात नाहीत? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आज त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचं एक शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला आलं होतं. त्यांनी महाराष्ट्रातली मंदिरं सुरु करण्याबाबत राज ठाकरेंकडे निवेदन दिलं. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ही भूमिका मांडली आहे. जर महाराष्ट्रातले मॉल्स उघडले जाऊ शकतात तर मग मंदिरं का नाही? योग्य खबरादारी घेऊन मंदिरं उघडली गेली पाहिजेत अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली आहे.

महाराष्ट्रातील मंदिरं हे लॉकडाउन जाहीर झाल्यापासून बंद आहेत. म्हणजेच मार्च महिन्यापासून ही मंदिरं बंद आहेत. कोणतीही गर्दीही होऊ नये आणि करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय सरकारने घेतला. मात्र आता ऑगस्ट महिना उजाडला आहे. अशात हळूहळू अनलॉकच्या दिशेने आपण जातो आहोत. असं सगळं असताना मंदिरं उघडण्यास काय हरकत आहे? योग्य खबरदारी घेऊन जर मॉल्स उघडले जाऊ शकतात, दुकानं उघडली जाऊ शकतात तर मंदिरं का उघडण्यात येत नाहीत? असे प्रश्न राज ठाकरेंनी विचारले आहेत.

दरम्यान आज राज ठाकरेंना त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचं शिष्टमंडळ भेटलं. त्यांच्या भेटीनंतर पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळानेही समाधान व्यक्त केलं आहे. उद्या श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आहे. अजूनही मंदिरं बंद आहेत. म्हणून आमचं शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला आलं होतं. आम्हाला त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर समाधान वाटतं आहे. राज ठाकरेंना भेटल्यानंतर मंदिरं उघडण्याच्या निर्णयाबाबत काहीतरी सकारात्मक घडेल असा आम्हाला विश्वास आहे असं पुजाऱ्यांनी म्हटलं आहे.