राज्यात सर्वत्रच किमान तापमानात वाढ झालेली असताना येत्या दोन दिवसांत उत्तरेकडील वाऱ्यांच्या आगमनाबरोबर अनेक ठिकाणी किमान आणि कमाल तापमनात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आठवडाभरात राज्यातील कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते, तर किमान तापमानात काही ठिकाणी वाढ होऊन २० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. मध्य भारतात वाहणाऱ्या उत्तरेकडील वाऱ्यामुळे पुढील दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई-पुणे येथील किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा खाली घसरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर २९ ते ३१ जानेवारीदरम्यान यात आणखीन घट होऊ  शकते.

शनिवारी राज्यात किमान तापमान १३ ते २० अंश सेल्सिअस दरम्यान होते, तर कमाल तापमान २८ ते ३४  अंश दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ, तर कोकण आणि मराठवाडय़ात किंचित वाढ झाली. राज्यभरात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १२.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.