मुंबई : प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आणि सहकलाकारांच्या विनोदाने सजलेल्या हाऊसफुल या चित्रपटाच्या चारही भागांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘हाऊसफुल ५’ हा हिंदी चित्रपट ६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट कसा वाटला हे विचारण्यासाठी अक्षय कुमार थेट ‘किलर मास्क’ घालून वांद्रे येथील एका चित्रपटगृहाबाहेर पोहोचला. हा एक भन्नाट व सुंदर अनुभव असल्याचे अक्षयने समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ पोस्ट करीत सांगितले आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार हा रविवार, ८ जून रोजी सकाळच्या सत्रात वांद्रे येथील एका चित्रपटगृहाबाहेर पोहोचला. मात्र यावेळी अक्षय कुमारभोवती चाहत्यांचा घोळका झाला नाही. कारण अक्षयने ‘किलर मास्क’ घालत चित्रपटगृहाबाहेर एंट्री केली होती. यावेळी ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट पाहून प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर पडत होते. याचवेळी अक्षय ‘किलर मास्क’ घालून प्रेक्षकांना विविध प्रश्न विचारत होता. ‘तुम्हाला हाऊसफुल ५ हा चित्रपट कसा वाटला?’ हा प्रश्न प्रामुख्याने त्याने प्रेक्षकांना विचारला. यावेळी प्रेक्षकांनीही चित्रपट उत्तम व चांगला असल्याचे सांगितले. यावेळी अक्षयसोबत अजून दोन व्यक्ती ‘किलर मास्क’ घालून होत्या. ‘किलर मास्क’ घातल्यामुळे प्रेक्षक अक्षयला ओळखू शकले नाहीत. मात्र आवाजावरून अक्षयला प्रेक्षकांनी ओळखण्याची दाट शक्यता होती. मात्र प्रेक्षकांनी ओळखण्यापूर्वीच अक्षय तिथून निघून गेला आणि हा एक भन्नाट अनुभव असल्याचे त्याने सांगितले.

‘आज किलर मास्क घालायचे सहज ठरवले आणि वांद्रे येथील चित्रपटगृहातून ‘हाऊसफुल ५’ चित्रपट पाहून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांशी संवाद साधत विविध प्रश्न विचारले. याप्रसंगी प्रश्न विचारताना मला लोकांनी पकडले असते. पण त्यांनी ओळखण्यापूर्वी मी तिथून निघून गेलो. हा एक भन्नाट व सुंदर अनुभव होता’, असे अक्षय कुमार याने समाजमाध्यमांवर लिहिलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. तसेच एक व्हिडिओही पोस्ट केला असून लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दोन वेगवेगळे क्लायमॅक्स (Housefull 5 A & Housefull 5 B) ही चित्रपटाची खासियत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हास्याने भरलेली ‘मर्डर मिस्ट्री’ पाहता येत आहे. तरुण मनसुखानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अक्षय कुमारसह रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान, श्रेयस तळपदे, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, डिनो मोरिया, चंकी पांडे, जॉनी लीवर, निकितिन धीर, जॅकलीन फर्नांडीज, नरगिस फाखरी, सोनम बाजवा, चित्रांगदा सिंह, सौंदर्या शर्मा हे कलाकार चित्रपटात झळकत आहेत.