मुंबई : वाऱ्यांची स्थिती बदलताच मुंबईला पुन्हा प्रदूषणाने विळखा घालण्यास सुरूवात केली आहे. मुंबईतील हवेचा दर्जा रविवारी सकाळी मध्यम श्रेणीत नोंदला असून वांद्रे – कुर्ला संकुल येथे ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली. ‘समीर’ ॲपनुसार रविवारी मुंबईच्या हवेचा निर्देशांक १५५ वर पोहोचला होता. पुढील काही दिवसांत फटाक्यांमुळे प्रदूषणात भर पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत सध्या आर्द्रता असल्याने सकाळी प्रदूषके साचून राहतात. त्यातच सुरू असलेली बांधकामे, प्रकल्प आणि आता दिवाळीनिमित्त उडवले जाणारे फटाके हवेचा दर्जा खालावण्यास हातभार लावत असल्याचे दिसते आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार, रविवारी वांद्रे – कुर्ला संकुल येथील हवा निर्देशांक ३०१, तर कुलाबा येथील २१० इतका होता. तसेच देवनारमध्ये २०७, खेरवाडी वांद्रे २१४, नेव्ही नगर कुलाबा २४४, शिवाजी नगर १६९, माझगाव १९६, चेंबूर १७९ आणि भायखळा येथे १५१ हवा निर्देशांक होता.

दरम्यान, रविवारी सायंकाळी हवा मध्यम श्रेणीत नोंदली गेली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार, हवा गुणवत्ता निर्देशांकातील ०-५० म्हणजे चांगले, ५१-१०० समाधानकारक, १०१-२०० मध्यम, २०१-३०० वाईट, ३०१-४०० अत्यंत वाईट आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे अतिधोकादायक समजली जाते.

भारतीय हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरासाठी दैनंदिन अंदाजामध्ये कोरड्या वातावरणाचा अंदाज वर्तविला आहे. तसेच कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर, किमान तापमान २१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यानंतर मुंबईतील वाऱ्यांची स्थिती बदलते, वेग मंदावतो. त्यामुळे हवेत साचलेली धूळ, प्रदूषके यांचा निचरा होत नाही. बाष्पामुळे धुलीकण हवेतच तरंगत राहतात. या नैसर्गिक कारणांबरोबच अनेक मानवनिर्मित कारणेही मुंबईच्या प्रदूषणात भर घालत आहेत.

पायाभूत सुविधा, रहिवासी व व्यावसायिक संकुले, नवे प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन वातावरणातील प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतात.

हवेचा दर्जा ढासाळल्याने काळजी काय घ्यावी ?

प्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार उद्भवतात. सकाळी आणि सायंकाळी धुरक्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी घराबाहेर पडणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. थंड पेय, तेलकट पदार्थ वर्ज्य करावे. लहान मुले, वयोवृद्ध यांच्यासाठी हे वातावरण धोकादायक असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी.

नवी मुंबईची हवाही ‘मध्यम’ श्रेणीत

नवी मुंबईमधील हवा देखील रविवारी ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली. तेथील हवा निर्देशांक १६७ इतका होता. नेरुळ येथील हवा निर्देशांक १७९, सानपाडा १८२, कळंबोली १८१ आणि तळोजा येथे १९९ इतका हवा निर्देशांक होता.