मुंबई : भारतात घुसखोरी करून बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या चार बांग्लादेशी नागरिकांना किल्ला न्यायालयाने दोन महिने कारावास आणि ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. त्यात दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता. यापूर्वी घाटकोपर पोलिसांनी पकडलेल्या दोन बांगलादेशी महिलांनाही पाच महिने कारावसाची शिक्षा सुनवाण्यात आली होती.
कुरार पोलिसांनी मालाडच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावजवळ जानेवारी महिन्यात केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत चार बांग्लादेशी नागरिकांना अटक केली होती. त्यांच्याविरोधात भारतात बेकादेशीर प्रवेश केल्याप्रकरणी परकीय नागरिक कायदा कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींमध्ये शुमन अब्दुल मलिक सरदार, मेहरून्निसा, अब्दुल मलिक सरदार आणि अल्पना शुमन सरदार आदींचा समावेश होता.
या आरोपींविरोधात मुख्य महानगरदंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) चालविण्यात आला. अवघ्या पाच महिन्यांत त्यांच्यावरील आरोप सिद्ध करून शिक्षा सुनावण्यात आली. पोलिसांनी आरोपींविरोधात सादर केलेले सर्व पुरावे सिद्ध झाले. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी के. एस. झंनवर यांनी या चार बांगलादेशी नागरिकांना दोन महिने कारावास, तसेच ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर या सर्व बांगलादेशी नागरिकांची रवानगी त्यांच्या देशात केली जाणार आहे, अशी माहिती कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तायडे यांनी दिली.
आठवड्याभरातील दुसरी घटना
घाटकोपर पोलिसांनी जानेवारी महिन्यात दोन बांगलादेशी महिलांना अटक केली होती. मागील आठवड्यात मुख्य महानगरदंडाधिकारी न्यायालयात या दोन्ही महिलांवर आरोप सिद्ध झाले होते. न्यायालयाने त्यांना ५ महिने साधी कैद आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. बांगलादेशी नागरिकांना शिक्षा सुनावण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.