छायाचित्रे काढणे, बोटीच्या छतावर उभे राहणे, पक्ष्यांना खायला घालण्याच्या प्रकारांत वाढ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नीलेश अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : बोटीने प्रवास करताना सूचना धुडकावून छायाचित्रे काढणे, चित्रफिती तयार करणे, पक्ष्यांना खाद्य देण्यात दंग होणाऱ्या प्रवाशांमुळे  अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई-मांडवा प्रवासादरम्यान मंगळवारी झालेल्या अपघातामुळे हुल्लडबाज प्रवाशांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मुंबई-मांडवा जलप्रवासादरम्यान मंगळवारी बोटीची फळी तुटून एक प्रवासी समुद्रात पडला. त्याला पोहता येत असल्याने जीवितहानी टळली, परंतु या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणात प्रसारित झाल्याने प्रवासी वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत अनेकांनी प्रश्नचिन्हही उपस्थित केले. समुद्रात पडलेल्या व्यक्तीने स्वत:ची चूक मान्य केल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

गेल्या काही वर्षांमध्ये हुल्लडबाज प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असून प्रवाशांनी जलप्रवासादरम्यान स्वत:ला आवर घालण्याची आवश्यकता आहे, असे संबंधित बोटींचे खलाशी आणि मुंबई मेरिटाइम बोर्डतील अधिकाऱ्यांनी सांगितले.    ‘नुकत्याच घडलेल्या अपघातात संबंधित व्यक्तीने स्वत:ची चूक मान्य केली. थोडक्यात अनर्थ टाळला. अन्यथा प्रवासी बोट चालवणाऱ्या व्यावसायिकांवर मोठे संकट ओढवले असते. आमच्याबाबत गैरसमज पसरवला गेला असता. परंतु आम्ही बोटीची आणि प्रवाशांची काळजी घेतो,’ असे गेट वे ऑफ इंडिया येथील जल वाहतूक व्यावसायिकांनी सांगितले.

गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ मी या व्यवसायात आहे. बोटींवर आमचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे आम्ही स्वत:इतकीच बोटीची काळजी घेतो. शिवाय कधीही बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतले जात नाहीत.बोटीत सेफ्टी जॅकेट, टायर्स आणि इतर सुरक्षेची उपकरणेही असतात. परंतु प्रवाशांनीही आम्हाला सहकार्य करण्याची गरज आहे. समुद्रात प्रवास करताना बेशिस्त वर्तन टाळायला हवे.  – इकबाल मुकादम, अध्यक्ष, गेट वे एलिफन्टा जल वाहतूक सहकारी संस्था

आम्ही गेली कित्येक वर्षे याच बोटींमधून रोज प्रवास करीत आहोत. आम्हाला कधीही धोका जाणवला नाही. कधी तरी तांत्रिक अडचणींमुळे बोटी समुद्रात बंद पडतात, पण तशी पर्यायी यंत्रणा तातडीने उभी केली जाते. बोट बंद पडल्यावर जेवढी भीती वाटत नाही त्याहून अधिक पर्यटक, प्रवाशांच्या हुल्लडबाजीमुळे वाटते. काही पर्यटक अत्यंत बेशिस्तीने वागतात.- राहुल कोळी, अलिबागकडे जाणारे प्रवासी

बोटी सुस्थितीतच

‘भाऊचा धक्का येथून मोरा, रेवसकडे जाण्यासाठी २० बोटी आहेत. या सर्व बोटी सुस्थितीत असून वर्षांतून एकदा त्याची डागडुजी केली जाते. डागडुजीनंतर मुंबई मेरिटाइम बोर्डाकडून बोटींचे सर्वेक्षण करून त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. हीच प्रक्रिया गेट वे ऑफ इंडिया येथून घारापुरी आणि मांडवासाठी सोडण्यात येणाऱ्या बोटींना लागू आहे. ’ असे मुंबई मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boat trip become danger due to riotous passengers zws
First published on: 11-02-2022 at 00:49 IST