मुंबई : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती घालून काळाचौकी येथे राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाला साबयर भामट्यांनी आठ लाखांचा गंडा घातला. अमली पदार्थांचा तस्करीत सहभाग, बॅंक खात्यात कोट्यवधींचा बेकायदेशीर व्यवहार होत असल्याचे सांगून त्याला घाबरविण्यात आले होते.
भायखला येथे राहणारा ३० वर्षीय तक्रारदार तरुण एका खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याला २९ जून २०२४ रोजी एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने अंधेरी येथील एका नामांकित कुरियर कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले. त्याच्या नावाने इराण येथून आलेले एक पाकीट विमानतळावर जप्त करण्यात आले आहे. त्यात ४५० ग्रॅम एमडी, ४ बाद झालेली इराणी पारपत्रे, ४ किलो कपडे, ५ डेबीट कार्ड इत्यादी साहित्य असल्याचे सांगितले. पोलिसांनी हे पाकीट जप्त केले असे तक्रारदाराला सांगण्यात आले. तात्काळ अंधेरी पोलिसांबरोबर फोन जोडला गेला आणि तक्रारदाराला अटकेची भीती घालण्यात आली. मात्र या पाकिटाशी आपला काही संबंध नाही. मला कुणी तरी फसवले आहे, असे फिर्यादीने सांगितले. त्यावर यातून बाहेर पडण्यासाठी अमली पदार्थ विभागाशी ऑनलाईन संपर्क साधावा, असे सांगून त्याला व्हिडियो कॉलसाठी स्काईप या ॲपची एक लिंक देण्यात आली.
हा व्हिडियो कॉल एकांतात करावा, तसेच याबाबत कुणालाही काही माहिती देऊ नये, असे त्याला बजावण्यात आले. व्हिडियो कॉलवर असलेल्या व्यक्तीने मुंबईतील अमली पदार्थ विभागातून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादीच्या आधार कार्डाचा वापर करून अनेक बनावट बॅंक खाती उघडण्यात आली आहेत. त्या खात्यात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करण्यात येत असल्याचे सांगून त्याला घाबरविण्यात आले. याचा आपल्याशी काही संबंध नाही, असे फिर्यादीने सांगितले. त्यावर या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी मुळ बॅक खात्यातील रक्कम सरकारी खात्यावर तात्पुरती जमा करावी लागेल आणि ती रक्कम नंतर परत केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
या प्रकारामुळे फिर्यादी तरुण प्रचंड घाबरला होता. त्याने समोरील व्यक्ती सांगेल तसे करण्यास सुरवात केली. समोरील सायबर ठकसेनाने त्याला मोबाइल स्क्रीन शेअर करण्यास भाग पाडले. फिर्यादीच्या मोबाइलमधील बॅंकीग ॲप उघडण्यास सांगितले. त्याच्या खात्यात त्यावेळी ७ लाख ७० हजार रुपये होते. ही रक्कम सायबऱ ठकसेनाने जन स्मॉल फायनान्स बॅंकेच्या खात्यात आरटीजीएस करून वळवून घेतली. यांतर १ लाख रुपये गुगल पेद्वारे अन्य एका खात्यात घेतले.
एक तासानंतर फिर्यादीने संपर्क साधला असता संबंधित सायबर ठकसेनाचा फोन बंद आला. यानंतर फिर्यादीने गुगलवर त्या कुरियर कंपनीबाबत माहिती घेतली असता ती कंपनी बोगस असल्याचे समजले. परंतु आपल्याला अमली पदार्थप्रकरणात अडकविण्यात आल्याच्या भीतीपोटी तो गप्प बसला होता. अखेर ११ महिन्यानंतर त्याने काळाचौकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार केली. या तक्रारीवरून अनोळखी सायबर भामट्याविरोधात फसवणुकीचे कलम ४२०, ४१९, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (ड) आणि ६६ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.