मुंबई : जोतिबा डोंगर हिरवागार करणे, तसेच श्रीक्षेत्र ज्योतिर्लिंग देवस्थान येथे येणाऱ्या भाविकांना उत्तम सोयी – सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा ‘दख्खन केदारण्य’ या नावाने निर्माण करण्याचा संकल्प सोडण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते जोतिबा डोंगर (कोल्हापूर) येथे राष्ट्रीय महामार्ग, वनविभाग, जिल्हा प्रशासन व पश्चिम देवस्थान समिती, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने १० हजार वृक्षारोपण, ‘दख्खन केदारण्या’ची निर्मिती आदी कामांसाठी श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरण स्थापन करण्यात आले. त्यावेळी फडणवीस बोलत होते. ‘दख्खन केदारण्य’ ही संकल्पना अत्यंत कौतुकास्पद असून तिची सुरुवात जागतिक पर्यावरण दिनी होत असल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. ‘जोतिबा मंदिर व परिसर विकास’ आराखड्यातून विविध विकास कामे व पर्यावरणपूरक प्रकल्प उभे राहत आहेत.

या कामांसाठी जिथे आवश्यकता असेल तेथे शासन पूर्णपणे सहकार्य करेल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले. जोतिबा डोंगर परिसरातील चार हजार वर्षांपूर्वीचे जंगल पुन्हा “दख्खन केदारण्य” या नावाने पुनर्निर्मित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक भेट देतात. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी हे उपक्रम महत्त्वाचे आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्याचा प्रमुख भाग म्हणजे जोतिबा डोंगर हिरवागार करणे. श्रीक्षेत्र ज्योतिर्लिंग देवस्थान येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे त्यांना उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि डोंगर परिसरातील वातावरणही उल्हासित राहावे, यासाठी विकास आराखड्यातून कामे होतील, अशी आशा फडणवीस यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास आमदार डॉ. विनय कोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.