मुंबई :  व्यावसायिक जितेंद्र नवलानी याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्ह्याचा तपास पुन्हा करण्याची मागणी पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केली आहे. त्याबाबत डांगे यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. व्यावसायिक नवलानीविरोधात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून खासगी कंपन्यांकडून ५८ कोटी ९६ लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी गेल्या आठवडय़ात मुंबई पोलीस आयुक्तांना सादर केलेल्या ३१ पानी पत्रात गावदेवी पोलिसांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी नवलानीविरुद्ध गुन्हा नोंदवला होता, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने हा गुन्हे रद्द करण्याचे आदेश दिले होते.  डांगे यांनी नवलानी आणि परमबीर सिंह हे मुंबई पोलीस आयुक्त असताना या प्रकरणाचा योग्य तपास न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत या प्रकरणाची पुन्हा तपासणी करण्याची मागणी केली आहे. २०१९ मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यांप्रकरणी डांगे यांनी चित्रफीत व ध्वनिफीत पुरावे म्हणून सादर केले होते. नोव्हेंबर २०१९ मध्ये रात्री उशिरा उघडलेले रेस्टॉरंट बंद करण्यासाठी गेले असता पोलिसांना त्यांचे कर्तव्य करण्यापासून रोखल्याचा आरोप करत दक्षिण मुंबईतील कुलाबा भागातील रहिवासी नवलानी यांच्या विरोधात गावदेवी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणानंतर डांगे यांची बदली करण्यात आली होती.