मुंबईत मंगळवारी सात रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनी मुंबईत एक अंकी मृत्यूंची नोंद झाली आहे. याआधी २० मार्चला मुंबईत सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मुंबईत आतापर्यंत १५ हजार जणांना करोनामुळे आपला जीव गमावला आहे. दरम्यान करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूची संख्या कमी झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या ९०० ते १००० वरुन घटली असून मंगळवारी ६८२ नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईत सध्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १५ हजारांपेक्षा जास्त असून पॉझिटिव्हीटी रेट तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. दैनंदिन रुग्णसंख्येची रोज रिअल टाइममध्ये अपडेट करणारं मुंबई एकमेव शहर आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि नागपूरसारखी शहरं एप्रिल आणि मे मध्ये झालेल्या मृत्यूंची नोंद सध्या देत आहेत. मंगळवारी पुण्यात ३७ तर नागपुरात १८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. Coronavirus : मुंबईत करोनाचे ६७३ नवे रुग्ण, ७ मृत्यू "मुंबईतील संपूर्ण व्यवस्थेचं विकेंद्रीकरण करण्यात आलेलं असून प्रत्येक प्रभाग त्यांच्याकडील रुग्णसंख्या आणि मृत्यूची माहिती देत आहे. यामुळे मुंबई योग्य पद्धतीने झालेल्या मृत्यूंची माहिती देऊ शकत आहे, यामुळे सर्व रेकॉर्ड एकत्र करण्याचा मुंबई पालिकेच्या मुख्यालयावरील बोजा कमी झाला आहे," असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. मुंबईत एकूण बाधितांची संख्या ७ लाख १३ हजारांपुढे गेली आहे. करोना मृतांची एकूण संख्या १५ हजार ७३ झाली आहे. एका दिवसात ७५१ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ६ लाख ८० हजारांहून अधिक म्हणजेच ९५ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या १५ हजार ७०१ उपचाराधीन रुग्ण आहेत. मंगळवारी २६ हजार ९९२ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी अडीच टक्के नागरिक बाधित आढळले. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.१२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही ५४३ दिवसांवर पोहोचला आहे.