मुंबई : महिला संबंधित गुन्ह्यांची संख्या राज्यात दरवर्षी वाढत असतानाच महाराष्ट्रातील अनिवासी भारतीय महिलांच्या छळाच्या तक्रारींचे प्रमाणही अधिक आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडे गेल्या पाच वर्षांत अनिवासी भारतीय महिलांच्या २,६२८ तक्रारी दाखल झाल्या असून त्यामध्ये महाराष्ट्रातील अनिवासी भारतीय महिलांच्या तक्रारींची संख्या २४२ आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाकडे दरवर्षी महिला संबंधित २३ प्रकाराच्या अत्याचाराच्या सरासरी ३० हजार तक्रारी दाखल होतात. त्यातील अनिवासी भारतीय महिलांच्या तक्रारीची संख्या पाहून आयोगाने ‘एनआरआय प्रकोष्ठ’ विभाग स्थापन केला आहे. या विभागाकडे राज्यवार अनिवासी भारतीय महिलांच्या देशातील आणि विदेशातील तक्रारी नोंदवल्या जातात.

अनिवासी भारतीय महिलांच्या तक्रारीमध्ये सर्वाधिक तक्रारी दिल्ली राज्यांमधून येतात. दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा असून तिसऱ्या क्रमांकाच्या तक्रारी महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातील तक्रारींचे प्रमाण १० टक्के आहे. या तक्रारींमध्ये पत्नीस सोडून देणे, घरगुती हिंसाचार, हुंड्यासाठी छळ, पारपत्र ताब्यात ठेवणे, बालकांचा ताबा न देणे, संपर्क तोडणे इत्यादीचा समावेश आहे.

उपाययोजनेवर भर

अनिवासी भारतीय महिलांच्या वैवाहिक तक्रारींचा निपटारा करणे किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे आयोग आता ‘एनआरआय’ विवाहसंदर्भात मार्गदर्शन करण्यावर भर देत आहे.

महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, हरियाणा या राज्यांच्या अनिवासी भारतीय महिलांच्या तक्रारी अधिक आहेत. त्यामुळे या राज्यांतील विद्यापीठांमध्ये ‘अनिवासी भारतीय विवाह : काय करा, काय करू नका?’ अशी शिबिरे घेऊन जनजागरण केले जात आहे.

तक्रारी सोडवण्यासाठी संबंधित देशातील भारतीय दूतावास, संबंधित देशाचा भारतातील दूतावास, परराष्ट्र मंत्रालय, केंद्रीय गृह विभाग, त्या देशातील स्वयंसेवी संस्था यांच्या समन्वयाने प्रक्रिया पार पाडली जाते. पीडित महिलांना कायदेविषयक आणि आर्थिक सहाय्य सूचीबद्ध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने केले जाते.

महाराष्ट्रातील तरुण-तरुणी परदेशात अधिक संख्येने आहेत. परिणामी महाराष्ट्रातील अनिवासी भारतीय महिलांच्या तक्रारी अधिक असणार. या तक्रारी राज्य महिला आयोगाकडेही येत असतात. माझ्या कारकीर्दीत मी ‘एनआरआय सेल’ स्थापन केला होता.

निर्मला सामंत- प्रभावळकर, माजी अध्यक्ष, राज्य महिला आयोग

आमच्याकडे परदेशातून आणि देशातूनही तक्रारी येतात. लग्न झाल्यानंतर पती परदेशात गेल्यानंतर पत्ता, ई-मेल, संपर्क क्रमांक बदलतो. पत्नीशी संपर्क तोडतो. त्याला नोटीस पाठवता येत नाही. त्याचे देशातले आई- वडील सहकार्य करत नाहीत. अनिवासी भारतीय महिलांच्या तक्रारींचा राज्यानुसार वेगवेगळ्या आहेत. हरियाणामध्ये पत्नीशी संपर्क तोडण्याच्या तक्रारी तर महाराष्ट्रात माहिती लपवण्याच्या तक्रारी अधिक आहेत.

विजया रहाटकर, अध्यक्ष, राष्ट्रीय महिला आयोग

महिलांच्या तक्रारी

वर्ष : एकूण महाराष्ट्रातील तक्रारी : तक्रारी

२०१९-२०२० : ६०८ : ४७

२०२०-२०२१ : ४८७ : ४२

२०२१-२०२२ : ४६३ : ४५

२०२२-२०२३ : ५३८ : ४९

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२३-२०२४ : ५२२ : ५९