मुंबई : कोकण रेल्वे एकेरी मार्गाची असल्याने रेल्वेगाड्या वेळेत धावण्यात अडथळा येत आहे. परिणामी, कोकण रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास विलंबाने होतो. त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास वेगवान व्हावा, त्यांना अतिरिक्त सेवा उपलब्ध व्हावी यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने टप्पा दुहेरीकरण (पॅच डब्लिंग) करण्यावर भर दिला आहे. टप्प्या दुहेरीकरण झाल्यास रेल्वेगाड्यांची संख्या दुप्पट होईल. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सोयीचा आणि सुखकर होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या २० वर्षांत कोकण रेल्वेवरील प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली. परंतु, त्या तुलनेने रेल्वेगाड्यांची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागतो. कोकण रेल्वेचे दुहेरीकरण प्रलंबित असल्याने, कोकण रेल्वे प्रवाशांचा गैरसोयीचा प्रवास होतो. कोकण रेल्वे रोहा – ठोकुर अशी ७३९ किमी दरम्यान आहे. यात रोहा – वीर ४६.८ किमी रेल्वे मार्गाचे ऑगस्ट २०२१ रोजी दुहेरीकरण पूर्ण झाले. परंतु, गेली साडेचार वर्षे दुहेरीकरणाला गती मिळाली नाही. त्यामुळे प्रवाशांना विलंबाचा फटका सहन करावा लागत आहे.
केवळ कोकणातच नव्हे तर अन्य राज्यात जाणाऱ्या रेल्वेगाड्या कोकण रेल्वेवरून धावतात. त्यामुळे कोकण रेल्वेवर रेल्वेगाड्यांची संख्या वाढत आहे. वाढत्या गर्दीला सामावून घेण्याची क्षमता कोकण रेल्वेमध्ये नसल्याने अनेक वर्षांपासून कोकण रेल्वेचे दुहेरीकरण करण्याचा मागणी आहे. परंतु, अनेक वर्षांपासून दुहेरीकरण प्रलंबित आहे. त्यामुळे कमी खर्चात आणि प्राकृतिक अडचणींवर मात करून टप्पा दुहेरीकरण केले जाणार आहे. टप्पा दुहेरीकरण करण्याबाबत अभ्यास करून, त्याचा अहवाल रेल्वे मंडळाकडे सुपूर्द केला जाईल, अशी माहिती कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
रेल्वेचे दुहेरीकरण करण्यास खर्च कसा येईल
- कोकणातील सपाट जमिनीवर रेल्वेचे प्रतिकिमी दुहेरीकरणासाठी साधारणपणे १५ ते २० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
- घाट, बोगद्याच्या ठिकाणी प्रतिकिमी खर्च ८० ते १०० कोटी रुपये अपेक्षित आहे.
- रोहा – वीरदरम्यान दुहेरीकरण करण्यासाठी ५३० कोटी रुपये खर्च आला होता.
कोकण रेल्वेवरून २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये २० हजार ५६ रेल्वेगाड्या, तर ६ हजार १७० मालगाड्या धावल्या. या मार्गावर दरदिवशी ५५ रेल्वेगाड्या आणि १७ मालगाड्या धावतात. टप्पा दुहेरीकरण झाल्यास, रेल्वेगाड्या धावण्याची क्षमता दुप्पट होईल, असा विश्वास कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.
कोकण रेल्वेच्या मार्गाचा अभ्यास करून, शक्य असलेल्या ठिकाणी टप्पा दुहेरीकरण करण्यात येणार आहे. याबाबत नियोजनबद्ध अभ्यास सुरू आहे. याबाबतचा अहवाल रेल्वे मंडळाला सादर करण्यात येणार असून त्याला मान्यता मिळाल्यानंतर तो सर्व राज्य सरकारांकडे दिले जाईल. निधी मिळाल्यानंतर टप्पा दुहेरीकरणाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली. खेड – रत्नागिरी, कणकवली – सावंतवाडी आणि मडगाव – ठोकुर दरम्यान टप्पा दुहेरीकरण करण्याचे नियोजन आहे.