मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी सायंकाळी वाहतूक सेवेत दाखल झाला. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्याने संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी, २४ तासांत या महामार्गावरून तब्बल ३८ हजार ९८७ वाहनांनी प्रवास केला. यापैकी ५ हजार वाहने नव्याने वाहतुकीसाठी खुल्या झालेल्या इगतपुरी – आमणे टप्प्यावरून धावली.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील ६२५ किमी लांबीचा नागपूर – इगतपुरी टप्पा वाहतूक सेवेत होता. इगतपुरी – आमणे हा ७६ किमी लांबीचा शेवटचा टप्पा गुरुवारपासून वाहतूक सेवेत दाखल झाला. त्यामुळे आता समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने वाहतूक सेवेत दाखल झाला असून नागपूर – आमणे, ठाणे प्रवास १६ तासांऐवजी ८ तासात करणे शक्य झाले आहे. एमएसआरडीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार नागपूर – इगतपुरीदरम्यान अडीच वर्षात (१ जून २०२५पर्यंत) दोन कोटी ११ लाख ३४ हजार ३२२ वाहनांनी प्रवास केला आहे. तर या वाहनांकडून पथकराच्या रुपाने एमएसआरडीसीला १५३० कोटी रुपये महसूल मिळाला आहे.

समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झाला आहे. आता नागपूरवरून थेट ठाणे, मुंबईला अतिजलद येणे शक्य झाले आहे. त्यामुळे आता मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आणि नागपुरला जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे. पहिल्या दिवशी समृद्धी महामार्गावरील प्रवासी संख्येत चांगली वाढ झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत नागपूर – इगतपुरीदरम्यान समृद्धी महामार्गावरून दिवसाला अंदाजे ३२ हजार वाहने धावत होती. आता यात वाढ झाली आहे. गुरुवारी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत समृद्धी महामार्गावरून ३०५ वाहनांनी प्रवास केला होता, तर यातून ४४ हजार रुपये महसूल मिळाला. तर गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ या २४ तासांत नागपूर – आमणे, ठाणे दरम्यान ३८ हजार ९८७ वाहनांनी प्रवास केला. या ३८ हजार ९८७ वाहनांपैकी ६७१ वाहनांनी खुटघर पथकर नाक्यापर्यंत प्रवास केला असून या वाहनांकडून दोन लाख ९८ हजार ९० रुपये पथकर वसूल करण्यात आला. तर आमणे नाक्यापर्यंत प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या ४४७६ इतकी आहे. या वाहनांकडून ४६ लाख ३३ हजार ९३० रुपये पथकर एमएसआरडीसीला मिळाला. समृद्धी महामार्गाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता नव्याने हा टप्पा सुरू झाला असून येत्या काळात प्रतिसाद आणखी वाढेल, असा विश्वास एमएसआरडीसीने व्यक्त केला आहे. त्याचवेळी आमणेवरून बाहेर पडल्यानंतर ठाणे, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. यावरही लवकरच तोडगा काढून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यात येईल आणि प्रवास सुकर केला जाईल, असेही एमएसआरडीसीकडून स्पष्ट करण्यात आले.