मुंबई : मलबार हिल येथील निसर्ग मार्गानंतर आता मुंबईकरांसाठी गोराई येथील कांदळवन उद्यानाचे नवे आकर्षण खुले होणार आहे. गोराई येथील ‘कांदळवन उद्याना’चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी गोराईतील ‘कांदळवन उद्यान’ लवकरच मुंबईकरांसाठी खुले होणार असल्याची माहिती समाजमाध्यमांवर दिली.
सिंगापूरच्या धर्तीवर साकारण्यात येणाऱ्या भारतातील पहिल्या ‘गोराई कांदळवन उद्याना’साठी ठाकरे सरकारच्या काळात परवानगी मिळाली होती. यावेळी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा प्रकल्प राबविला होता. २०२३ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार होता. दरम्यान, आता या कांदळवनाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते मुंबईकरांसाठी खुले होणार असून हा प्रकल्प आमचे सरकार असताना झाला असल्याचा आनंद आदित्य ठाकरे यांनी एक्सवर माहिती देत व्यक्त केला आहे.
तसेच मलबार हिल येथील नेचर पार्क प्रमाणे हा प्रकल्प देखील आमच्यासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. कांदळवन उन्नत मार्ग (बोर्ड वॉक) हे या उद्यानातील प्रमुख आकर्षण असून उद्यान गोराई खाडीत उभारण्यात आले आहे. या उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून या कांदळवन उद्यानात पर्यटकांना सुमारे ७०० माटर मार्गावरून थेट कांदळवनाची सफर करता येणार आहे. गोराई येथे आठ हेक्टर क्षेत्रावर तर दहिसर येथे ३० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन उद्यान विकसित होत आहे. हे उद्यान गोराई जेट्टीजवळ असून तेथे समृद्ध कांदळवने दिसतात. तेथे निसर्ग पर्यटन केंद्र व कांदळवन मार्ग हे मुख्य आकर्षण आहे.
७०० मीटर लांबीचा उन्नत मार्ग
सिंगापूर, अबूदाबी, थायलंडच्या धर्तीवर गोराईमध्ये उन्नत मार्ग तयार केला आहे. हा मार्ग लाकडी असून त्याची लांबी ७०० मीटर आणि रुंदी २.४ मीटर आहे. तसेच या मार्गात जागोजागी विश्रांतीस्थळ आणि नाहितीस्थळ आहेत. हा उन्नत मार्ग तयार करताना कोणत्याही वनस्पतीला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. गोराई कांदळवन उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांत लोकाप्पण होण्याची शक्यता आहे.