मुंबई : प्रभादेवी पुलाचे पाडकाम आणि पुनर्बांधणीत बाधित होणाऱ्या प्रभादेवी पुलालगतच्या हाजी नुरानी आणि लक्ष्मी या दोन इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाच आता या दोन्ही इमारती म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींच्या यादी समाविष्ट झाल्या आहेत. या दोन्ही इमारतींना म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने ‘७९ अ’अंतर्गत पुनर्विकास प्रक्रिया सुरू करण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. लवकरच घरे रिकामी करण्याची नोटीसही बजावण्यात येणार आहे. त्यामुळे आता या दोन्ही इमारतींमधील रहिवाशांच्या संकटात वाढ झाली आहे.

अटल सेतूला जोडणाऱ्या वरळी – शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत प्रभादेवी पूल पाडून त्याजागी नवीन डबलडेकर पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या कामात हाजी नुरानी आणि लक्ष्मी या दोन इमारती बाधित होत असून इतर १७ इमारतींना धक्का पोहचण्याची भिती आहे. त्यामुळे १९ इमारतींमधील रहिवाशांनी पुलाच्या पाडकामाला विरोध करून पुलाचे पाडकाम रोखून धरले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १९ इमारतींचा समुह पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यासंबंधीचा कोणताही शासन निर्णय अद्याप जारी झालेला नाही वा यासंबंधीचे कोणतेही लेखी आश्वासन सरकारकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे रहिवासी संभ्रमात असून त्यांनी लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय प्रभादेवी पूल पाडू न देण्याची ठाम भूमिका घेतली आहे. परिणामी, पुलाचे पाडकाम, पुनर्बांधणी रखडली आहे. आता या दोन इमारती म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाच्या पावसाळापूर्व सर्वेक्षणात अतिधोकादायक यादीत समाविष्ट झाल्या आहेत. त्यामुळे नियमानुसार या दोन्ही इमारतींना दुरुस्ती मंडळाने ‘७९ अ’ची नोटीस बजावली असून पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नोटीशीनुसार इमारतींच्या मालकाला पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. सहा महिन्यांत मालकाकडून प्रस्ताव सादर न झाल्यास सोसायटीला पुनर्विकास प्रस्ताव सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. या पुढील सहा महिन्यात सोसायटीचा प्रस्ताव न आल्यास म्हाडाकडून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास मार्गी लावला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हाडाने ‘७९ अ’ची नोटीस बजावलेली असतानाच आता लवकर अतिधोकादायक इमारतींच्या अनुषंगाने घरे रिकामी करण्याचीही नोटीस रहिवाशांना बजावण्यात येणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या नोटीशीनंतर आता लवकरच दुरुस्ती मंडळाकडून घरे रिकामी करण्याचीही नोटीस बजावण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या नोटीशीनंतर रहिवाशांना एक तर म्हाडाच्या संक्रमण शिबिरात हलविले जाईल वा नवीन निर्णयानुसार दरमहा २० हजार रुपये घरभाडे दिले जाईल. दरम्यान, एककीडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दोन इमारतींमधील रहिवाशांना कुर्ल्यात तात्पुरता पुनर्वसित करण्याचे ठरवले आहे. त्याला रहिवाशांचा विरोध असून प्रभादेवी परिसरातच एमएमआरडीएने गाळे द्यावेत, अशी मागणी त्यांची आहे. तसेच १९ इमारतींच्या समुह पुनर्विकासाबाबत शासन निर्णय जारी करण्याचीही मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे. या मागण्या मान्य झाल्याशिवाय पुलाचे पाडकाम न होऊ देण्याची ठाम भूमिका रहिवाशांनी घेतली आहे. आता म्हाडाने या इमारतींना अतिधोकादायक घोषित केली आहे. या इमारती म्हाडाकडून रिकाम्या करून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे रहिवाशांचे संकट वाढले आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत इमारती रिकाम्या करणार नाही, यावर रहिवासी ठाम आहेत. आमच्या इमारतीची तीन वर्षांपूर्वीच आवश्यक ती दुरुस्ती झाली आहे. असे असताना आमची इमारत अतिधोकादायक कशी बनली, असा प्रश्न येथील रहिवासी मुनाफ ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. तर राज्य सरकारने लवकरात लवकर समुह पुनर्विकासाबाबत शासन निर्णय जारी करावा, अशी मागणीही त्यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा केली.