मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करताना निरनिराळ्या कारणांमुळे प्रवाशांचा अपघात होत असून या अपघातांमध्ये काही जणांचा मृत्यू, तर काही जण जयबंदी होतात. घरातील कर्ता पुरुष वा महिलेचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. रेल्वे अपघाताची प्रकरणे रेल्वे दावे न्यायाधिकरणाकडे (आरसीटी) दाखल होतात. मात्र या प्रकरणांचा निकाल लागण्यास प्रचंड विलंब होत असून वर्षानुवर्षे आर्थिक मदत न मिळाल्याने अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांची परवड होते. परिणामी, रेल्वे दावे न्यायाधिकरणासमोरील दावे तातडीने निकाली लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अपघातातील मृतांच्या वारसांना आर्थिक भरपाई म्हणून मुख्यमंत्री निधीतून तातडीची मदत म्हणून पाच लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु, रेल्वे प्रशासनाने याबाबत अद्याप मदत जाहीर केलेली नाही. रेल्वे प्रशासन घटनेची संपूर्ण चौकशी केल्यानंतर भरपाई देण्याविषयी निर्णय घेणार आहे. मुंब्रा घटनेतील प्रवासी लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करीत होते. रेल्वे प्रवासासाठी तिकीट विकत घेणाऱ्या प्रवाशांना लोकलमध्ये जागा उपलब्ध करून देणे ही रेल्वेची जबाबदारी आहे. गेली अनेक वर्षे रेल्वे त्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे या प्रकरणातील मृतांच्या वारसदारांना तातडीने भरपाई देणे आवश्यक आहे. लवकरात लवकर या प्रकरणांचा निकाल लावणे गरजेचे आहे, असे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी सांगितले.

पूर्वी रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांच्या वारसाला नुकसान भरपाई म्हणून चार लाख रुपये देण्यात येत होते. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या नातेवाईकांना देण्यात येणारी रक्कम आठ लाख रुपयांपर्यंत वाढविली होती. परंतु, सध्याची महागाई, शैक्षणिक खर्च, आरोग्यावरील खर्च, दैनंदिन मूलभूत गरजांवरील खर्चाच्या तुलनेत ही रक्कम अत्यंत कमी आहे. त्यात ही रक्कम मिळविण्यासाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा करावा लागतो. त्यामुळे ही प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावणे आवश्यक आहे, असे झवेरी यांनी सांगितले.

हमालांअभावी मृतदेह उचलण्यास विलंब

अनेक रेल्वे स्थानकात हमाल नाहीत. त्यामुळे रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे मृतदेह रेल्वेमार्गावरून उचलण्यास विलंब होतो. त्यामुळे स्थानकातील इतरांना मृतदेह उचलावा लागतो.

सर्वाधिक अपघात रेल्वे रूळ ओलांडताना

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर प्रवासादरम्यान जानेवारी २०२१ ते मे २०२५ या कालावधीत एकूण १० हजार २३९ प्रवाशांचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे रेल्वे रूळ ओलांडताना झाले आहेत. मध्य रेल्वेवरील ३,१५१ आणि पश्चिम रेल्वेवरील १,९७० प्रवाशांचा रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. उद््वाहन (लिफ्ट), सरकते जिने, पादचारी पूल उभारण्यात येत आहेत. तसेच, रेल्वेच्या दोन्ही दिशेला सुरक्षा जाळी आणि सुरक्षा भिंत उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी वारंवार उद्घोषणा करून जनजागृती करण्यात येत आहे, असे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.