लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: गेल्या दोन महिन्यांत मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे परिसरातील भंगाराची विक्री करून ४५.२९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. कार्यशाळा, आगारे, कारखाने, रेल्वे परिसरातील निरुपयोगी रूळ, मोडीत काढलेले डबे, वाघिणी, इंजिने, रुळाचे साहित्य, चाके, पोलादी खांब व इतर धातूच्या वस्तूंची विक्री करण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेने ‘शून्य भंगार मोहीम’ हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागूपर या पाच विभागांत मोठ्या प्रमाणावर भंगार विक्री करण्यात येत आहे. प्रत्येक विभागातील कार्यशाळा आणि शेडमधील भंगार विकण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे भंगाराने अडवून ठेवलेली जागा स्वच्छ होत आहे. भंगार विक्रीत लोह, स्टील, अॅल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूच्या भंगाराची विक्री करण्यात आली आहे. भंगार विक्रीतून एप्रिल २०२३ मध्ये २२.६ कोटी रुपये आणि मे २०२३ मध्ये २२.६९ कोटी रुपये असे एकूण ४५.२९ कोटी रुपये रेल्वेला मिळाले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.