लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी राजस्थानमधून आणखी एका व्यक्तीला अटक केली. यामुळे या प्रकरणातील अटक झालेल्यांची संख्या पाच झाली आहे. सलमानच्या घराची पाहणी करण्यात आरोपीचा सहभाग होता.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद रफिक चौधरी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला राजस्थानमधील रेल्वेतून पकडण्यात आले. त्याला मंगळवारी दुपारी मुंबईत आणण्यात आले. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या सागर पाल आणि विक्की गुप्ता यांची चौधरीने दोन वेळा मुंबईत भेट घेतली होती. सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाची पाहणी करण्यातही त्याचा सहभाग होता. चौधरी गेल्या पाच-सहा वर्षांपासून बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता आणि टोळीत तरुणांना भरती करण्यातही त्याचा सहभाग असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

आणखी वाचा-रेल्वे मार्गालगत वृक्ष छाटणीस वेग, वृक्ष छाटणीचे ५० टक्के काम पूर्ण

सलमानच्या घरावर १४ एप्रिल रोजी गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल यांना गुजरातमधून अटक केली होती. त्यांना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी सोनू सुभाषचंदर बिष्णोई (३७) व अनुज थापन (३२) यांना पंजाब येथून अटक करण्यात आली होती. चंदर याची शेती व किराणा दुकान आहे. तसेच थापन हा ट्रकवर मदतनीस म्हणून कामाला आहे. बिष्णोई टोळीकडून दोन्ही आरोपींना दोन पिस्तुल व ४० काडतुसे पुरवण्यात आली होती. ती पिस्तुले देण्यासाठी चंदर व थापन १५ मार्च रोजी पनवेलला आले होते. ते पनवेलमध्ये तीन तास थांबले होते. त्यावेळी त्यांनी सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विक्की गुप्ता व सागर पाल यांना पिस्तुल दिले होते. याप्रकरणातील आरोपी अनुज थापन याने नुकतीच पोलीस कोठडीत आत्महत्या केली होती. त्याशिवाय टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिष्णोई व त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई यांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.