मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी खोपोली – कुसगावदरम्यान १९.८० किमी लांबीची नवीन मार्गिका अर्थात मिसिंग लिंकचे काम हाती घेतले आहे. हा प्रकल्प ऑगस्टपर्यंत पूर्ण करून मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन होते. मात्र काही कारणांमुळे प्रकल्पाला विलंब झाला असून आता या प्रकल्पाचे काम नोव्हेंबरअखेरीस पूर्ण करून डिसेंबरमध्ये मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील सुसाट आणि सुरक्षित प्रवासासाठी वाहनचालक – प्रवाशांना डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

मागील काही वर्षांपासून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांच्या संख्येच प्रचंड वाढ झाली आहे. या महामार्गावरून सध्या दररोज ६५ हजार वाहने धावतात. तर गर्दीच्या वेळी वाहनांची संख्या एक लाखांवर जाते. त्यामुळे महामार्ग अपुरा पडत असून अपघातांची भिती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने खोपोली – कुसगावदरम्यान १९.८० किमी लांबीची नवीन मार्गिका अर्थात मिसिंग लिंक बांधण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार असून २०१९ मध्ये दोन प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

पहिल्या टप्प्याचे काम मे. नवयुग इंजिनीयरिग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडने, तर दुसऱ्या टप्प्याचे काम मे. एफकाँन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने सुरू केले. १९.८० किमी लांबीच्या मार्गिकेत दोन बोगद्यांचा समावेश असून यापैकी एक बोगदा १.७५ किमी, तर दुसरा बोगदा ८.९२ किमी लांबीचा आहे. त्यापैकी ८.९२ किमी लांबीचा बोगदा आशियातील सर्वांत रुंद असा डोंगराखालून आणि तलावाखालून जाणारा बोगदा आहे. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास ५०० ते ६०० फूट अंतरावर हा बोगदा आहे. बोगद्याची रुंदी २३.७५ मीटर आहे. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बोगद्याचे काम करण्यात येत आहे. प्रवासी, वाहने यांच्या सुरक्षेचा बारकाईने विचार करून हा बोगदा बांधण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर जाण्यासाठी प्रत्येक ३०० मीटरवर मार्ग तयार करण्यात आले आहेत. बोगद्याच्या भिंतीवर आगप्रतिबंधक लेपन करण्यात येणार आहे. आग लागल्यास ती विझवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करण्यात येणार आहे. हा बोगदा, नवी मार्गिका अनेक बाबींमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरणारा आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांमुळे प्रकल्पास विलंब झाला आहे. दरम्यान, या प्रकल्पाचे ९३ टक्के काम पूर्ण झाले असून हा प्रकल्प ऑगस्टमध्ये वाहतूक सेवेत दाखल होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केले होते. मात्र हा मुहूर्त चुकल्याची माहिती एमएसआरडीसीतील विश्वसनीय सूत्रांनी दिली. या मार्गिकेचे काम प्रचंड आव्हानात्मक आहे. नवी मार्गिका दऱ्याखोऱ्यांतून जात असून १०० मीटर खोल दरीत पूल बांधण्यात येत आहेत. हे काम अत्यंत कठीण आहे. त्यात मे महिन्यात प्रचंड पाऊस झाल्याने त्याचा कामाला फटका बसला. त्यामुळे कामास विलंब झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसात, वादळवाऱ्यात यंत्रसामग्रीची ने-आण करणे अवघड बनते. आता पावसाळ्यात काम संथगतीने सुरू राहण्याची शक्यता आहे. परिणामी ऑगस्टपर्यंत काम पूर्ण होऊ शकणार नाही. आतापर्यंत या प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी नोव्हेंबर उजाडणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर डिसेंबरमध्ये ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होईल, असेही सूत्रांनी सांगितले.