लोकसत्ता टीम

नागपूर : मित्राच्या प्रेम प्रकरणाचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या युवकावर तीन आरोपींनी तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली. ही घटना पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी १२ फेब्रुवारीला रात्री १ वाजताच्या सुमारास घडली.

अभिषेक उर्फ भांजा संजय गुलाबे (२३, रा. तांडापेठ, पाचपावली) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर रोहीत सुनिल नाहरकर (१८), श्याम बाबु कुसेरे (३०) आणि राजकुमार बंडु लाचलवार (२०) सर्वजण रा. पंचकुआ हनुमान मंदिराजवळ, पाचपावली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अभिषेकचा मित्र आशिष याचे एका मुलीवर प्रेम होते. त्यामुळे मुलीचा नातेवाईक असलेला रोहितसोबत आशिषचा वाद सुरु होता. त्यामुळे आशिषने आपल्या प्रेमप्रकरणाचा वाद मिटविण्यासाठी आपला मित्र अभिषेकला रोहितकडे पाठविले.

आणखी वाचा-पंजाबच्या व्यापाऱ्यांचे भरधाव वाहन नदीच्या पुलावरून थेट खाली कोसळले; दोघांचा मृत्यू, एक गंभीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिषेक चार मित्र घेऊन रोहितकडे पंचकुआ हनुमान मंदिराजवळ गेला. तेथे अभिषेकसोबत रोहित आणि त्याच्या दोन साथीदारांनी वाद घातला. त्यानंतर आरोपींनी संगणमत करून हातात तलवार घेऊन अभिषेकला जीवे मारण्याच्या हेतूने त्याच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेतील अभिषेकला मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अभिषेकची आई रत्नमाला संजय गुलाबे (४१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावलीचे सहायक पोलिस निरीक्षक प्रविण सोमवंशी यांनी आरोपींविरुद्ध हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.