यवतमाळ : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या स्थानिक आझाद मैदानाला अतिक्रमणाचे ग्रहण लागले होते. अखेर नगरपरिषद प्रशासन आणि महसूल विभागाच्या संयुक्त कार्यवाहीतून हे मैदान अतिक्रमणमुक्त झाले आहे. परंतु, या ठिकाणी अनेक वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या व्यवसायिकांनी मात्र, या कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
आझाद मैदानाला ऐतिहासिक महत्व आहे. स्वातंत्र्य लढ्याची आंदोलने याच मैदानातून सुरू झाली. चौतीस कलम या नावानेही हे मैदान ओळखले जायचे. परंतु ऐतिहासिक लढ्याची साक्ष देणाऱ्या या आझाद मैदानाला अतिक्रमणाचे ग्रहण लागले होते. या मैदानाचा निम्म्याहून अधिक भाग खाद्य पदार्थ विक्रेत्या हातगाडीवाल्यांनी व्यापला होता. काही भाग टॅक्सी, मेटॅडोअर, मालवाहू चारचाकी वाहनांच्या पार्किंगने व्यापला होता. ज्या मैदानात स्वातंत्र्याची रणशिंग फुकल्या गेले असे आझाद मैदान व्यावसायिकांच्या ताब्यात गेले होते. याबाबत वाढते दबावतंत्र आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत अखेर प्रशासनाने येथील अतिक्रमण हटविले. परंतु, या जागेवर पुन्हा व्यवसाय करू दिला जावा, या मागणीसाठी येथील व्यावसायिकांनी संवैधानिक मार्गाने प्रयत्न सुरू केले आहे.
आझाद मैदानात महसूल विभागाने मीनाबाजारसाठी परवानगी दिली होती. ऐतिहासिक महत्व असलेल्या या मैदानाचे व्यावसायिकरण झाल्याने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच येथे मीना बाजार भरविण्याबाबत शहरवासियांमध्ये नाराजी होती. या अनुषंगाने आझाद मैदानातील अतिक्रमण हटविण्यासोबतच ते पुन्हा बसणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश तत्कालीन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांना २०१५ मध्ये दिले होते. मात्र त्यानंतरही यवतमाळच्या आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने नगरपरिषद, महसूल व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
प्रशासनाच्या डोळ्यादेखत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन सुरू होते. परंतु, पाच वर्षे जुन्या मागणीवर अंमलबजावणीसाठी २०२५ साल उजाडावे लागले. या कारवाईविरोधात १४ व्यावसायिकांनी न्यायालयात याचिका दाखल केली. कारवाईला स्थगिती देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षाने बाजू मांडली. याचिकाकर्त्याचा वकील उपस्थित नसल्याने आता या प्रकरणाची सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे.
मैदानी खेळ, सामाजिक कार्यक्रमांसाठी मागणी
आझाद मैदानाचा सुयोग्य वापर करण्यासाठी शहरातील काही सामाजिक संघटना व क्रीडा प्रेमींनी पुढाकार घेतला आहे. येथे खेळाचे मैदान आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी हे मैदाना राखीव ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. क्रीडा प्रेमी अनंत पांडे, सुभाष डोंगरे, राजू जॉन, संजय कोल्हे, अमोल देशमुख, प्रदीप वानखेडे, विकास टोणे आदींनी ही मागणी केली आहे.