गडचिरोली : टायगर कॉरिडॉर व्यतिरिक्त इतर मार्गांवर वनविभागाने अडचण निर्माण करू नये. वनविभागाने काम करताना लोकाभिमुखता ठेवावी, वन अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची दहशत खपवून घेतल्या जाणार नाही. मनमानी केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,असा इशारा मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे घेतलेल्या आढावा बैठकीत दिला. जिल्ह्यातील रस्त्यांच्या बांधकामात वन विभाग कायद्याचा धाक दाखवून आडकाठी आणत असल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रकाशित केले होते. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी वनविभागाचे चांगलीच खरडपट्टी काढली.
आढावा बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले, माझ्या विकासाच्या अजेंड्यावर गडचिरोली जिल्हा अग्रक्रमांकावर असल्याने शासनाच्या सर्व विभागांनी याची जाणीव ठेवावी आणि त्यांच्या अजेंड्यावर देखील हा जिल्हा अग्रक्रमावर ठेवून त्या पद्धतीने गडचिरोलीत विकास कामे करावे.गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर समन्वय यंत्रणा कार्यरत असून, ती सुरळीतपणे कार्यरत राहील याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले. विशेषतः मध्यप्रदेशातून येणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांकडे दक्षतेने लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले.
पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये पुरेसे अन्नधान्य, औषधांचा साठा आणि गर्भवती महिलांसाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतराच्या उपाययोजनांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी करावयाच्या कायमस्वरूपी उपयोजनाअंतर्गत मंजूर पाच टप्प्यांपैकी किमान दोन टप्पे यंदा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले. वनक्षेत्रातील रस्त्यांच्या बांधकामांबाबत वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग आणि संबंधित इतर विभागांनी समन्वय ठेवून काम करावे.
जिल्ह्यातील महत्त्वाचे रस्ते व पूल प्रकल्प जलद गतीने पूर्ण करावेत असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडवण्यासंदर्भात त्यांनी संबंधित विभागांना निर्देश दिले. बैठकीला सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे, सीसीएफ जितेंद्र रामगावकर, खासदार नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होते.
मुख्यमंत्र्यांचा गडचिरोलीत मुक्काम
६ जून रोजी आपल्या गडचिरोली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या टोकावरील अति संवेदनशील कवंडे गावाला भेट दिली. त्यानंतर ते गडचिरोली पोलीस मुख्यालयात आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात उपस्थित होते. यावेळी १२ जहाल नक्षलवाद्यांनी त्यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. संध्याकाळी उशिरापर्यंत आढावा बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीत मुक्काम केला. यादरम्यान त्यांनी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले व भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांनी नागपूरच्या दिशेने प्रस्थान केले.