नागपूर : महाविकास आघाडीतील शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) सांगलीत उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून आमदार विश्वजीत कदम हे सांगलीच्या जागेसाठी धावाधाव करीत आहे. कदम यांनी दिल्लीत काल वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर आज नागपुरात त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि सरचिटणीस मुकुल वासनिक यांची भेट घेतली.

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून नाराजीनाट्य सुरू झाले आहे. भिवंडी आणि सांगली या दोन जागांवर राष्ट्रवादी (शरद पवारगट), शिवसेना (उद्धव ठाकरेगट) यांनी उमेदवाराची घोषणा केल्याने काँग्रसने तीव्र व्यक्त केली असून मित्रपक्षांनी आघाडीचा धर्म पाळला पाहिजे असा सल्ला काँग्रेसने दिला आहे.

हेही वाचा…खासदार सुनिल मेंढेना शेतकऱ्यांनी प्रचारापासून रोखले, आल्या पावलीच…

शरद पवार यांनी भिवंडी लोकसभा आणि संजय राऊत यांनी सांगलीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. या दोन्ही जागेवर काँग्रेसचा दावा आहे. त्यामुळे काँग्रेसने चर्चा सुरू असताना परस्पर उमेदवार जाहीर करण्यावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

भाजपाचा पराभव करण्यासाठी आघाडीतील घटक पक्ष एकत्र आले आहेत. मग, अशाप्रकारे परस्पर उमेदवार जाहीर करणे योग्य नाही. सांगली ही काँग्रेसची पारंपारिक जागा आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज असणे स्वाभाविक आहे. आघाडीचा धर्म वरिष्ठ नेते पाळत नसतील तर कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण होणे स्वाभाविक आहे. केवळ दोन जागांचा विषय होता. तो समोपचाराने सोडण्याऐवजी उमेदवाराची नावे जाहीर केली गेली. अशा पद्धतीने वागणे अमान्य आहे.

हेही वाचा…विदर्भातील सर्वपक्षीय घराणेशाही, भाजपही मागे नाही

आम्ही जागा वाटपात त्यांना सांभाळून घेतले. अजूनही वेळ गेली नाही, त्यांनी याबाबत विचार करावा, असे काँग्रेसने म्हटले आहे. तर सांगलीमध्ये काँग्रेसतर्फे विशाल पाटील इच्छुक असून त्यांच्या उमेदवारीसाठी आमदार विश्वजीत कदम आग्रही आहेत. त्यासाठी ते काल ते दिल्लीत गेले होते. पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रभारी यांची भेट घेण्याची सूचना केल्यानंतर ते आज नागपुरात आले.

हेही वाचा…सूजी म्हणते, ‘कोण खासदार, लोकसभा काय असतं…’, गडचिरोलीच्या दुर्गम भागातील भयाण वास्तव

रमेश चेन्निथला विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल ते चंद्रपूर येथे प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारसभेसाठी हजर होते आणि आज ते मध्य नागपुरात विकास ठाकरे यांचा प्रचार मिरवणुकीत सहभागी झाले. त्यांच्यासोबत मुकुल वासनिक देखील आहेत. या दोन्ही नेत्यांची कदम यांनी आज सकाळी येथे एका खासगी हॉटेलात तासभर चर्चा केली. सांगलीच्या जागेबाबत एक-दोन दिवसात अंतिम निर्णय होईल, असे सांगण्यात येत आहे.