नागपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्न अन्नत्याग आंदोलन करणारे आमदार बच्चू कडू यांना शिवसेना (उद्धव ठाकरे) यांचा पाठिंबा आहे. त्यांनी आज आंदोलन मागे घेतल्याचे ऐकले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे. सरकारने बच्चू कडू यांना लेखी आश्वासन दिल्याचेही सांगण्यात येत आहे. बच्चू कडू यांनी मात्र तूर्तास आंदोलनाला स्थगित देत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर मागणी मान्य झाल्यास येत्या २ ऑक्टोबरला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी गुरूकूंज मोझरी येथे उपोषणस्थळी पोहचून बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यांनी यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भातील पत्र वाचून दाखवले. उदय सामंत यांनी बच्चू कडू यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर बच्चू कडू यांनी हे आदोलन तूर्त स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मनोज जरांगे यांना आश्वासन दिले. सरकारने ते आश्वासन पूर्ण केले. मनोज जरांगे पाटीलांचे काय झाले. त्यामुळे हे सरकारने बच्चू कडूला दिलेले आश्वासन पूर्ण करेल, यावर आजतरी विश्वास ठेवणे कठीण आहे. भाजप प्रणित हे सरकार बच्चू कडूचे जरांगे पाटील करणार नाही, याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही, असे जाधव म्हणाले.
दरम्यान, आंदोलन स्थगित करताना बच्चू कडू म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही कर्जमाफीची तारीख जाहीर करण्यास तयार नाहीत. पण, आम्ही आता त्यांना २ ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याप्रमाणे आंदोलन केले जाईल. सध्या पावसाचे दिवस आहेत. शेतकऱ्यांना पेरण्या कराव्या लागणार आहेत. या आंदोलनामुळे पेरण्या प्रभावित होण्याचे आणि शेतकऱ्यांचे वर्षभराचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने आपण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आपण १६ जूनपासून अन्नत्यागासोबतच जलत्याग आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला होता. डॉक्टरांनी उपचाराचा सल्ला दिला आहे. मी उपोषण सोडवावे, अशी विनंती शेकडो हितचिंतकांनी केली आहे. काही कार्यकर्त्यांनी तर आम्ही कुटुंबासहित आत्महत्या करू, अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांचा आदर राखून आम्ही हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.