अकोला : बोगस व बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून जन्म प्रमाणपत्र मिळवणारे लाभार्थी आता गायब झाले आहेत, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. जुलै ते डिसेंबर २०२४ मध्ये उशिराने जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी राज्यात दोन लाखावर अर्ज आले होते. मात्र, गेल्या दोन महिन्यात दोन हजार अर्ज सुद्धा दाखल झाले नाहीत. त्यामुळे प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचे सिद्ध होते, असा दावाही देखील सोमय्या यांनी केला.
जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घेऊन चर्चा केली. राज्यात बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र दिल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. अकोला जिल्ह्यात तब्बल १५ हजार ८४५ जन्म प्रमाणपत्र उशिराने देण्यात आले आहेत. जिल्ह्यात विविध भागांत वास्तव्यास असलेल्या अनेकांनी गैरमार्गाने जन्म दाखले मिळवले. या प्रकरणात महसूल विभागाकडून संबंधित प्रमाणपत्रधारकांची पडताळणी केली. शाळांच्या दाखल्यांची देखील तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये विविध गंभीर प्रकार आढळून आले आहेत. कागदपत्रांमध्ये खोडतोड व फेरफार केले. ते प्रशासनाला सादर करीत जन्म प्रमाणपत्र प्राप्त केल्याच्या अनेक घटना जिल्ह्यातील विविध तालुक्यात समोर आल्या आहेत. या प्रकरणात संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रारी दाखल केल्या.
जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ मधील कलम १३ (३) नुसार जन्म व मृत्यू प्रमाणपत्र निर्गमित करतांना चुकीची कागदपत्रे सादर केल्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. अकोला शहरांमध्ये एका गुन्ह्यात सर्वाधिक २३ आरोपी निष्पन्न झाले आहेत. मूर्तिजापूर तालुक्यात दोन गुन्ह्यात दोन, बार्शीटाकळी तालुक्यात तीन गुन्ह्यात १२, पातूर तालुक्यात एका गुन्ह्यात पाच, अकोट एका गुन्ह्यात नऊ व तेल्हारा तालुक्यात एका गुन्ह्यात एक असे एकूण नऊ गुन्हे ५२ आरोपींवर दाखल झाले आहेत.
या सर्व प्रकरणावर किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. अकोला जिल्ह्यातील साडे सहा हजारावर जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांची देखील विभागामार्फत चौकशी केली जाईल, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. यावेळी आमदार वसंत खंडेलवाल, माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.