Mumbai Rains Today LIVE Updates : मोसमी पावसाविषयी दावेप्रतिदावे सुरू असतांनाच पावसाने आता खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामान खात्याने याला मोसमी पाऊस म्हणून घोषित केले असतानाच आता पावसाच्या या वाऱ्यांनी दडी मारली आहे. राज्यातील काही भाग वगळता उर्वरित बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली नाही.

कोकण आणि विदर्भ वगळता इतरत्र पावसाने सुट्टी जाहीर केली आहे. तळकोकणापासून ते रत्नागिरीपर्यंत पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळत आहे. विदर्भातही पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून, त्या धर्तीवर या भागांसाठी हवामान विभागाने “यलो अलर्ट” जारी केला आहे.

दरम्यानच्या काळात उर्वरित राज्यात मात्र तापमानात चढ- उतार होताना दिसेल असाही इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. विदर्भात प्रामुख्याने वर्धा, अमरावती, यवतमाळ या भागांमध्ये पावसाची हजेरी असेल. उत्तर प्रदेशापासून विदर्भाच्या पूर्वेपर्यंत सक्रिय असणारा कमी दाबाचा तीव्र पट्टा आता विरळ झाला आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहेत. हवामान खात्याने पुढील २४ तासांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

त्यानुसार मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी वगळल्या, तर उष्मा जाणवण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यानच्या काळात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह एखादी सर बरसू शकते असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाने वेळेपेक्षा बऱ्याच आधी हजेरी लावली. मात्र, अरबी समुद्रातूनच प्रवाह कमी झाल्याने मोसमी पावसाचा वेग मंदावला आणि हे मोसमी वारे मोठ्या सुट्टीवर गेले. मोसमी पावसाच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली असून १० जूनपर्यंत तरी मोसमी पावसाचा प्रवास थांबणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यानच्या काळात पश्चिम किनारपट्टीसह राज्यातील काही भागांतच हलका पाऊस पडू शकतो. बहुतांश जिल्हे मात्र कोरडेच राहतील असे हवामान खात्यासह कृषी विभागानेही सांगितले आहे. बदललेल्या या वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानात वाढ होईल. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असेही आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.