गडचिरोली : गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद हद्दपार करण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मागील काही वर्षात पोलीस दलाने केलेल्या धाडसी कारवाईमुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे.
यामुळे अनेक मोठ्या नक्षल नेत्यांनी आत्मसमर्पण केले असून नक्षलवादाविरोधातील लढाई आता अंतिम टप्प्यात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते ६ जून रोजी गडचिरोली दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावाला भेट दिली. यावेळी पोलीस मुख्यालयात १३ आत्मसमर्पित जोडप्यांचा विवाह पार पडला. सोबतच बारा जहाल नक्षलवाद्यांनी त्यांच्यापुढे आत्मसमर्पण केले.
गडचिरोली पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे मी मनापासून अभिनंदन करतो. मागील दहा वर्षांपासून सुरक्षा दलाने सातत्याने विविध अभियानाच्या माध्यमातून नक्षलवादाचे कंबरडे मोडले आहे. अतिसंवेदनशील भागात पोलीस मदत केंद्र उभारून सुरक्षेची पोकळी भरून काढली. गेल्या दोन वर्षात सहा पोलीस स्टेशन उभारण्यात आले आहे.
या माध्यमातून आज अतिदुर्गम भागात प्रशासन पोहोचले आहे. यामुळे २०२१ ते २०२५ दरम्यान १२४ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. ६३ जणांनी आत्मसमर्पण केले. तर ८३ जहाल नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. नक्षलवादाविरोधातल्या लढाईत ही कामगिरी ऐतिहासिक आहे. यामुळे चळवळीतील अनेकांना कळून चुकले की या मार्गाने जाणे आता शक्य नाही. ही वैचारिक लढाई राहिलेली नाही. त्यामुळेच अनेक मोठ्या नक्षल नेत्यांनी आत्मसर्पणाचा मार्ग निवडला आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अनेकजण या मार्गावर आहेत.
यामुळे जिल्ह्यात आजघडीला बोटावर मोजण्याइतके नक्षलवादी शिल्लक राहिले आहेत. गडचिरोली पोलिसांनी नक्षलवादाविरोधात लढाईचा नवा मॉडेल विकसित केला आहे. लोह प्रकल्पांमुळे गडचिरोली स्टील हब म्हणून विकसित होत आहे. प्राकृतिक सौंदर्य जपत उद्योग उभारणीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. त्यामुळे लवकरच गडचिरोलीतील नक्षलवाद संपुष्टात येईल असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, पालाकसचिव मिलिंद म्हैसकर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह पोलीस व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
१२ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
गडचिरोली पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर १२ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात चार विभागीय समिती सदस्यांच्याही समावेश आहे. विशेष म्हणजे, गडचिरोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन सशस्त्र महिला नक्षलवाद्यांनी एके ४७ शस्त्रासह आत्मसमर्पण केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करून संविधान हाती देत सत्कार केला. मागील महिन्यात कवंडे येथे झालेल्या चकमकीत चार जहाल नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिसांनी ठार केले होते. या अभियानात सहभागी पोलीस अधिकारी व सी-६० जवानांचादेखील मुख्यमंत्र्यांनी प्रशस्तीपत्र देत गौरव केला. यावेळी शहीद महेश नागुलवार यांच्या पत्नीला एक कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
१३ आत्मसमर्पितांनी बांधली लग्नगाठ
एकेकाळी नक्षल चळवळीतील गडचिरोलीचा मुख्य कमांडर असलेला गिरीधर तुमरेटी याच्यासह तेरा आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांनी शुक्रवारी शहीद पांडू आलाम सभागृहात लग्नगाठ बांधली. यावेळी पार पडलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून नवविवाहितांना शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी फडणवीस यांनी अतिदुर्ग कवंडे येथे भेट देऊन नागरिकांना जीवनापयोगी साहित्याचे वाटप केले व त्यांच्याशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.