चंद्रपूर : लगतच्या गडचिरोली जिल्ह्याप्रमाणेच चंद्रपूर जिल्ह्यातही धार गिरण्यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा तांदूळ घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय समितीने नागभीड येथील चांदतारा इंडियन स्टीम राईस इंडस्ट्रीज व गुप्ता राईस एक्सपोर्ट या दोन धान गिरण्यांवर छापे टाकले. यात उचल केलेले धान व प्रत्यक्षात भरडाई केलेल्या तांदळाच्या साठ्यात मोठी तफावत आढळून आली. त्यामुळे समितीने तांदूळ घेण्यास बंदी घातली.

राज्य सरकार पणन अधिकाऱ्यांमार्फत हमीभावानुसार शेतकऱ्यांकडील धान खरेदी करीत असते. या आधारभूत धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांमार्फत योजना राबवली जाते. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी आधारभूत धान खरेदी केंद्रे ठरवून दिली आहेत. याद्वारे बहुतांश आदिवासी विकास महासंघ आणि जिल्हा मार्केटिंग अधिकारी धान खरेदी करीत असतात. यासाठी तालुकास्तरावर विविध कार्यकारी शेतकरी सहकारी सोसायट्यांनाही आधारभूत धान खरेदी केंद्रे दिलेली आहेत. या माध्यमातून धान खरेदी केले जाते. धान भरडाईसाठी जिल्हा पणन अधिकारी धान गिरण्यांना ‘डिलीव्हरी ऑर्डर’ देत असतात. त्यावरून धान गिरणी धारक धानाची उचल करतात. उचल केलेल्या धानाच्या ६७ टक्के तांदूळ शासनाला द्यायचे असतो. हा तांदूळ सरकारी स्वस्त धान्य दुकानांमार्फत नागरिकांना वितरित केला जातो.

दरम्यान, धान गिरणी धारकांनी उचल केलेले धान व त्यानंतर भरडाई केलेले तांदूळ यात साम्य आहे की नाही, हे तपासण्याचे काम जिल्हा पणन अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आहे. प्रत्यक्षात चंद्रपूर जिल्ह्यात धान गिरणी धारकांकडून उचल केल्या गेलेले धान आणि भरडाई केलेल्या तांदळाच्या साठ्यात हजारो क्विंटलची तफावत दिसून आली.

तांदूळ उचलण्यास मनाई

याबाबतची तक्रार राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय समिती चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आली. समितीने स्थानिक अधिकाऱ्यांना सोबत घेतले खरे, मात्र त्यांना कुठलीही कल्पना न देता चिमूरला जायचे आहे, असे सांगून थेट नागभीड गाठले. तेथील चांदतारा इंडियन स्टीम राईस इंडस्ट्रिज व गुप्ता राईस एक्सपोर्ट या दोन धान गिरण्यांवर छापे टाकले. तेथील तांदळाचा साठा तपासला असता मोठी तफावत आढळून आली. चौकशी अहवाल पूर्ण होईपर्यंत येथील तांदूळ उचलण्यास मनाई करण्यात आली. तसेच या धान गिरणी धारकांना धानाची भरडाई करण्यासाठी उचल देण्यात येऊ नये, असे आदेशही देण्यात आले.

अधिकारी, धान गिरणी धारकांची हातमिळवणी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही अधिकारी व धान गिरणी धारक यांच्या हातमिळवणीतून हा तांदूळ घोटाळा करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात जिल्हा पणन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, उपसचिव राजश्री सारंग यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय समितीने या दोन्ही धान गिरण्यांवर अचानक छापा कारवाई केल्याचे सांगितले. या दोन्ही धान गिरण्या महेंद्र गुप्ता यांच्या असल्याचे सांगितले जात आहे.