लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : उन्हाळी सुट्टी लागल्याने मुलांना मामाच्या गावाचे वेध लागले आहेत. तसेच महिलांनाही रोजच्या धावपळीतून काही विसाव्याचे क्षण मिळावेत, यासाठी माहेरी जाण्याची ओढ लागली आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने शहरातून एप्रिल ते जून या कालावधीत जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीनिमित्त मे महिन्यात पालकांकडून भटकंतीचे नियोजन करण्यात येते. काहींचे मामाचे गाव तर, काही धार्मिक पर्यटनासह राज्यातील निसर्गरम्य ठिकाणी भेट देण्याचे नियोजन करतात. एकाचवेळी मोठ्या संख्येने प्रवासी भटकंतीसाठी बाहेर पडत असल्याने कमी बससेवेमुळे त्यांची निराशा होऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एप्रिल ते जून या कालावधीत जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.

शहरातील नाशिक आगार (एक) मधून चोपडा, धुळे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक आगार (दोन) मधून नंदुरबार, जळगाव, पाचोरा, सप्तश्रृंग गड येथे जाण्यासाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत. मालेगाव येथून छत्रपती संभाजी नगर, शिवाजी नगर, चाळीसगाव, सटाणा येथून नाशिक, नंदुरबार, जळगाव, सिन्नर येथून नाशिक, अहमदनगर, शिर्डी, नांदगाव येथून पाचोरा, छत्रपती संभाजी नगर, इगतपुरी येथून धुळे, चोपडा, नंदुरबार, कसारा, लासलगाव येथून कोळपेवाडी, शिवाजीनगर, नाशिक, संभाजीनगर, कळवण येथून शिवाजीनगर, येवला, शिर्डी , मालेगाव, पिंपळगाव येथून नंदुरबार, शिरपूर, पाचोरा, धुळे या ठिकाणांसाठी जादा बसफेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याव्यतिरिक्त नाशिक-सप्तश्रृंग गड, नाशिक-त्र्यंबक, नाशिक -शिर्डी या मार्गावर इलेक्ट्रिक बसचा फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. नाशिक-शिवाजीनगर, नाशिक-धुळे, नाशिक-छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, सटाणा मार्गावर दर अर्ध्या तासाने फेऱ्या उपलब्ध आहेत. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.