नाशिक : भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला आहे. जीएसटीच्या नव्या कररचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळेल, असा विश्वास भाजपचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला. भाजप नाशिक महानगरच्या वसंतस्मृती या कार्यालयात उपाध्ये यांनी ही माहिती दिली.
यावेळी व्यासपीठावर भाजप महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, उत्तर महाराष्ट्र माध्यमिक विभाग प्रमुख गोविंद बोरसे, नाशिक महानगर सरचिटणीस ॲड. श्याम बडोदे, महिला मोर्चा अध्यक्ष स्वाती भामरे, नाशिक महानगर उपाध्यक्ष चित्रेश वस्पटे, पंचवटी मंडळ अध्यक्ष राहुल कुलकर्णी,नाशिक महानगर प्रसिद्धी प्रमुख पियुष अमृतकर आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराच्या रचनेमध्ये केलेली ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी व सर्वांना लाभ मिळवून देणारी सुधारणा आहे. ही सुधारणा अंमलात येईल तेव्हा, देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होईल. मागणी आणि उत्पादन वाढणार असल्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन कुटुंबांच्या आर्थिक संपन्नतेची नवी सुरुवात होईल, असा विश्वास केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला.
शेतकरी, मध्यम व लघु उद्योगक्षेत्र, मध्यमवर्गीय समाजघटक, महिला आणि युवावर्गास या सुधारणांमुळे होणाऱ्या नव्या अर्थनीतीचा लाभ होईल. आणि व्यावसायिकांना व्यवसाय सुलभतेचा अपूर्व आनंद उपभोगता येईल.
देशातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून नवी जीएसटी कररचना तयार करण्यात आल्याने देशात नागरिक केंद्रीत उत्क्रांतीची सुरुवात झाली असून समाजाच्या अखेरच्या स्तरापर्यंतच्या प्रत्येक नागरिकाचे जीवनमान यामुळे उंचावणार आहे. सध्याच्या चार स्तरीय कर रचनेचे सुसूत्रीकरण करून केवळ १८ टक्के आणि पाच टक्के एवढ्या दोन स्तरांत नवी जीएसची करआकारणी होणार असल्याने अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा हलका किंवा नाहीसा होणार आहे, असे उपाध्ये यांनी सांगितले.
आर्थिक सुधारणांचा वेग वाढविणे, ही देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची गरज होती. केंद्रातील भाजप सरकारने हे ओळखून सुधारणांना बळ देणाऱ्या योजना आखल्या व त्यांच्या अंमलबजावणीवरही लक्ष केंद्रीत केले. एक मजबूत अर्थव्यवस्था असलेला आत्मनिर्भर भारत उभा करण्याचे उद्दिष्ट या सुधारणांमुळे शक्य झाले असल्याचे उपाध्ये यांनी नमूद केले.