जळगाव : आम्ही आमदार कार्यकर्त्यांवर रागावतो, तो आमचा अधिकारच आहे. मात्र, कार्यकर्तेही आमच्यावर राग करतात. लग्नात आलेच पाहिजे म्हणून आग्रह धरतात. तिथे गेल्यानंतर वेळेवर लग्न लावत नाहीत. काही जण तर हात ओढून नाचायला लावतात. एवढी सर्व सोंगे आम्हाला करावी लागतात. त्यामुळे आमदार होणे सोपे नाही, अशी कबुली शिवेसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते तथा जिल्ह्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात पाळधी येथे एका कार्यक्रमानिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या विनोदी शैलीत टोलेबाजी केली. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून समाजात वावरताना कसे हाल सहन करावे लागतात, त्याचेही वर्णन खुमासदारपणे केले. ज्याची त्याची भूमिका त्याला माहिती असते.
कोणी सांगावे की गुलाबराव पाटील घरी आहेत आणि सकाळी अकरापर्यंत झोपले आहेत. आमचा दिनक्रम सकाळी आठला सुरू होतो आणि रात्री दहाला संपतो. ९० टक्के लग्न, शेंडीचे कार्यक्रम आणि अंत्ययात्रा आम्ही सोडत नाही. कारण, तिथे गेलो नाही तर विरोधक आमच्या कार्यकर्त्यांना हिणवतात. तू तर खूप उड्या मारायचा. आला का तो तुझ्याकडे, असे टोमणे मारतात. त्यामुळे कार्यकर्त्यांची कॉलर ताठ राहण्यासाठी कितीही हाल झाले तरी ते आम्ही सहन करतो, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.
कार्यकर्ता आमच्यासाठी निवडणुकीच्या वेळी रात्रंदिवस राबतो. बूथवर थांबून मतदारांच्या पाया पडतो. प्रसंगी हाणामारी करण्यासही मागे-पुढे पाहत नाही. त्याची इज्जत सांभाळणे आमचे कामच आहे. मात्र, मी पण आता काही गोष्टी शिकून घेतल्या आहेत. काही काही ठिकाणी लोक बोलावतात. परंतु, मी त्या गावात गेल्यावर कार्यकर्त्यांना आधीच तो आपल्याबरोबर होता का म्हणून विचारून घेतो.
नाही म्हटल्यावर गाडी माघारी घेण्यास सांगतो. कारण, त्या लग्नाला गेल्यावर समोरची व्यक्ती मत नाही दिले तरी मी त्याच्याकडे गेलो म्हणून माझ्या कार्यकर्त्याला डिवचते. ज्यामुळे त्याला मान खाली घालावी लागते, अशी चौफेर फटकेबाजी पालकमंत्री पाटील यांनी केल्याने उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले. यावेळी चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे, रावेर-यावलचे आमदार अमोल जावळे उपस्थित होते.