नाशिक – शहरातील प्राणघातक हल्ले, टोळक्यांचा धुडगूस, लूटमार, वाहनांची तोडफोड, सोनसाखळी खेचून नेणे, आदी गुन्हेगारी घटनांचा आलेख वाढतच असल्याने गुन्हेगारी रोखण्यासाठी आयुक्तालयातर्फे तडकाफडकी ११ पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात काही निरीक्षकांना दुय्यम पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे.

शहरातील वाढती गुन्हेगारी हा काही दिवसांपासून चर्चेचा विषय झाला आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या कालावधीत २५ हत्यांची नोंद झाली आहे. गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या निर्माण झाल्या असून दहशतीसाठी त्यांच्याकडून वाहनांची तोडफोड, लूटमार, रात्री उशिरापर्यंत चौकांमध्ये धुडगूस असे प्रकार केले जातात.

वाढत्या गुन्हेगारीविरुध्द नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असताना शिवसेनेने (उध्दव ठाकरे) नाशिकरोड परिसरात स्वाक्षरी मोहीम सुरु केली. तसेच मनसेने आंदोलनाचा इशारा दिला. काही वरिष्ठ निरीक्षक, कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी निरीक्षकांच्या बदल्या केल्या.

यानुसार पंचवटीचे मधुकर कड यांची अंबड पोलीस ठाणे, भद्रकालीचे गजेंद्र पाटील यांची पंचवटी, अंबडचे गजेंद्र पाटील यांची भद्रकाली, उपनगरचे जितेंद्र सपकाळे यांची नाशिकरोड, नियंत्रण कक्षातील संजय पिसे यांची आडगाव, देवळाली कॅम्पचे जयंत शिरसाठ यांची उपनगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय काही वरिष्ठ निरीक्षकांना दुय्यम पदांवर नियुक्ती देण्यात आली. त्यात सातपूरचे विश्वास पाटील यांची चुंचाळे पोलीस चौकी, आडगावचे सचिन खैरनार आणि चुंचाळे चौकीचे मनोहर कारंडे यांची अंबड, भद्रकालीचे श्रीनिवास देशमुख यांची देवळाली कॅम्प आणि नाशिकरोडचे अशोक गिरी यांची सरकारवाडा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. अंबडचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांना पुढील आदेश होईपर्यंत नियंक्षण कक्ष येथे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांनी तत्काळ कामाच्या ठिकाणी हजर व्हावे, असे आदेश आयुक्त कर्णिक यांनी दिले आहेत.