बोईसर : संपूर्ण पालघर जिल्ह्याला सिंचन आणि बिगर सिंचनासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या धामणी धरणामध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. सूर्या प्रकल्प अंतर्गत धामणी धरणामध्ये सध्या ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास १५ टक्के अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.
जुलै महिन्यापर्यंत शिल्लक पाणीसाठा पुरणार असला तरी पावसाने ओढ दिल्यास पाणी संकट निर्माण होऊ नये यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून नागरीकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पालघर पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाअंतर्गत धामणी आणि कवडास ही दोन प्रमुख धरणे आहेत. सर्वाधिक २७६.३५ दलघमी पाणीसाठवण क्षमता असलेल्या धामणी धरणात सध्या ९०.५५ दलघमी (३२.७७ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी या काळात धरणात अवघा ५१.१४ दलघमी (१८.५०टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. धामणी धरणाच्या खालच्या बाजूस असलेल्या कवडास उन्नेयी बंधाऱ्यात आजमितीस ४.१६ दलघमी (४१.७७ टक्के) तर वांद्री मध्यम प्रकल्पात ३.४२ दलघमी (९.५० टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात सहा ते आठ मे दरम्यान व २४ मे रोजी वळीवाच्या पावसाने हजेरी लावली होती. सूर्या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात एक जून पासून अवघ्या ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धामणी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.
सूर्या प्रकल्पात मुबलक पाणीसाठा शिल्लक असताना जिल्ह्यातील मनोर, माहीम केळवा, देवखोप, रायतळे, खांड, मोहखुर्द, या लघू पाटबंधारे योजना मात्र तळ गाठण्याच्या बेतात असून सहा बंधाऱ्यांमध्ये अवघा २.८२९ दलघमी पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे या योजनांवर अवलंबून असलेल्या स्थानिक पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या आहेत.
सिंचन आणि बिगर सिंचनासाठी २४० दलघमी पाणीसाठा आरक्षित
सूर्या धरण प्रकल्पातून घरगुती २१६ दलघमी आणि औद्योगिक २३ दलघमी असा एकूण २४० दलघमी बिगरसिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये पालघर जिल्ह्यातील डहाणू, बोईसर, पालघर या शहरांसह अदानी औष्णिक वीज प्रकल्प, तारापुर अणूऊर्जा प्रकल्प, भाभा अनुसंधान केंद्र ,तारापुर औद्योगिक क्षेत्र आणि वसई विरार आणि मीरा भाईंदर या मोठ्या महानगरपालिका क्षेत्राचा समावेश आहे.
पाण्याची नासाडी टाळण्यासाठी उपाययोजना
रब्बी हंगामात सूर्या आणि वांद्री धरण प्रकल्पातून डहाणू आणि पालघर तालुक्यातील पाच हजारपेक्षा जास्त हेक्टरवरील शेतीला सिंचनाचे पाणी पुरविले जाते. पालघर पाटबंधारे विभागामार्फत पिण्यासाठी आणि शेतीला पाणीपुरवठा करताना होणारी पाण्याची नासाडी रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्याचे काम सुरु आहे. सूर्या नदीवरील मासवण बंधारा येथे नवीन झडपा बसवल्यामुळे समुद्रात वाहून जात नासाडी होणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे.
सूर्या डावा तीर आणि उजवा तीर कालव्यांचे अस्तरीकरण आणि बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमुळे पाण्याची होणारी नासाडी रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थानी अंतर्गत जलवाहिन्यांमधून होणारी पाणी गळती रोखणे, नागरीकानी पाण्याचा काळजीपूर्वक वापर करून पाणी बचत करण्याचे आवाहन पालघर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी केले आहे.