पालघर: राज्यातील बहुतांश ठिकाणी निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी महिन्यांच्या प्रतिक्षेला सामोरे जावे लागते. मात्र पालघर जिल्हा परिषदेने हा पारंपरिक नियम मोडीत काढत निवृत्तीच्या दिवशीच सर्व आर्थिक लाभ देऊन नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि प्रशासनाबद्दल कृतज्ञता दिसून आली.

३१ मे रोजी ६६ कर्मचाऱ्यांनी सेवा निवृत्ती स्वीकारली. त्यांच्या सन्मानार्थ जिल्हा परिषदेच्या जननायक बिरसा मुंडा सभागृहात आयोजित ‘आनंदी सेवा निवृत्ती दिन’ कार्यक्रमात शाल व पुस्तक भेट देऊन २ जून रोजी सन्मान करण्यात आला. यावेळी सुमारे साडेआठ कोटी रुपयांचे लाभ तत्काळ वितरित करण्यात आले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत, मुख्य लेखा व. वित्त अधिकारी धनराज पांडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी, वित्त विभागाचे गुलाबराव कांबळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुनील वाडेकर आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना रवींद्र शिंदे यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांना जागरूक आणि जबाबदारीची भूमिका निभावणाऱ्या नागरिकांचे उदाहरण बनण्याचे आवाहन केले. तसेच यापुढे स्वतःसाठी जगा असे सांगून त्यांना आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्याच्या शुभेच्छाही दिल्या. मुख्य लेखा अधिकारी धनराज पांडे यांनी यावेळी सांगितले की, “गट विमा योजनेच्या १३०० प्रकरणांचे निराकरण करण्यात आले असून १५० प्रकरणे प्रक्रियेत आहेत. कोणीही पेन्शन वा विम्यापासून वंचित राहणार नाही. तीन ते सहा महिन्यांत पेन्शन अदालत आयोजित केली जाईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लेखा विभागाने सेवा पुस्तकांची अचूक तपासणी करून त्रुटी दूर केल्याने हे वेळेवर लाभ वितरण शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “सेवानिवृत्तीच्या आधी विस्तार अधिकारी म्हणून काम करण्याची संधी आणि निवृत्तीच्या दिवशीच लाभ मिळाल्यामुळे मला अत्यंत समाधान वाटते.” असे मत यावेळी नितीन जव्हारकर यांनी व्यक्त केले. राज्यभरात उदाहरण ठरणारी ही कार्यपद्धती इतर जिल्ह्यांनी आत्मसात करण्याची गरज असल्याचे अनेकांनी यावेळी नमूद केले.