Kashmir politicians visit kheer Bhawani temple जम्मू आणि काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यातील तुळमुल्ला गावात असलेले पवित्र खीर भवानी मंदिर सध्या राष्ट्रीय आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. ३ जून २०२५ रोजी हिंदू कॅलेंडरमधील अत्यंत शुभ दिवस मानल्या जाणाऱ्या ज्येष्ठाष्टमीच्या दिवशी सुरू झालेल्या वार्षिक खीर भवानी उत्सवासाठी हजारो भाविक मंदिरात गर्दी करताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे मेहबूबा मुफ्ती आणि मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी या मंदिराला भेट दिल्याने हे मंदिर चर्चेत आले आहे. काश्मीरमध्ये या मंदिराचे महत्त्व काय? मोठ्या संख्येने नेते या हिंदू मंदिराला भेट का देत आहेत? त्याविषयी जाणून घेऊयात.

खीर भवानी मंदिर

  • खीर भवानी मंदिर देवी रागन्या देवीला समर्पित आहे.
  • विशेषतः विस्थापित काश्मिरी पंडित समुदायासाठी या मंदिराचे महत्त्व अधिक आहे.
  • दक्षिण काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षाविषयक चिंता वाढल्या आहेत. मात्र, असे असूनही या उत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. यातून भाविकांची अढळ श्रद्धा दिसून येते.
  • यात्रेकरूंनी हे स्पष्ट केले आहे की, भीतीचे सावट श्रद्धेवर पडणार नाही.
खीर भवानी मंदिराला राहुल गांधी यांनीदेखील भेट दिली होती. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

भाविकांना आश्वस्त करण्यासाठी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले आहे की, खीर भवानी मेळा आणि आगामी अमरनाथ यात्रा या दोन्हींसाठी कडक सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. ते म्हणाले, ” आता लोकांमधील भीती कमी होत चालली आहे. ही गर्दी आपल्यात फूट पाडू पाहणाऱ्यांना एक कडक उत्तर आहे.”

कोणत्या प्रमुख नेत्यांनी दिली मंदिराला भेट?

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी ३ जून रोजी या मंदिराला भेट दिली, प्रार्थना केली. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनीदेखील माता खीर भवानी मंदिराला भेट दिली. ते म्हणाले, “आम्ही माता खीर भवानी यांचे आशीर्वाद घेतले. आम्ही एकोप्याने राहतो आणि एकोप्याने राहू.” पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनीदेखील ३ जून रोजी माता खीर भवानी मंदिराला भेट दिली. या सर्व नेत्यांच्या भेटीमुळे उत्सवाला राजकीय आणि प्रतीकात्मक महत्त्व प्राप्त झाले. या भेटीदरम्यान त्यांनी म्हटले, “बंदुका हा उपाय नाही. या राजकीय प्रक्रियेत काश्मिरी पंडित बंधू आणि भगिनींनी तोडगा काढण्याकरिता सहभागी झाले पाहिजे.”

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी सदर-ए-रियासत डॉ. करण सिंह यांनी मंदिराला २ जून रोजी भेट दिली. त्यांनी प्रशासनाच्या तयारीचे कौतुक केले. त्यांनी खीर भवानी मेळा आणि अमरनाथ यात्रेत मोठ्या प्रमाणातील सहभागाला प्रोत्साहन दिले. २० मे रोजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या मंदिराला भेट देत काश्मिरी पंडितांसाठी त्याचे प्रतीकात्मक महत्त्व अधोरेखित केले.

मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व

खीर भवानी मंदिराची सध्याची रचना १९१२ मध्ये महाराजा प्रताप सिंह यांच्या कारकिर्दीत बांधली गेली आहे. मात्र, या जागेचे पावित्र्य शतकानुशतके जुने आहे. हे मंदिर एका झऱ्याजवळ आहे. या झऱ्यातील पाण्याचा रंग बदलतो असे मानले जाते. बदलत्या पाण्याच्या रंगाला बहुतेकदा भाविक दैवी चिन्ह मानतात. मंदिराचे नाव खीर (दूध आणि तांदूळापासून तयार होणारा गोड पदार्थ) या पारंपरिक नैवेद्यावरून पडले आहे. रागन्या देवीला हा नैवेद्य दाखवला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काश्मिरी पंडितांसाठी सांस्कृतिक महत्त्व

काश्मिरी पंडित समुदायासाठी हे मंदिर केवळ पूजास्थळ नाही तर एक सांस्कृतिक आणि भावनिक आधार आहे. १९९० च्या दशकातील बंडखोरीदरम्यान विस्थापित झालेले अनेक पंडित दरवर्षी या मेळ्यासाठी काश्मीरमध्ये परत येतात. २०२५ चा खीर भवानी मेळा हा केवळ धार्मिक मेळावा नसून तो काश्मीरमधील एकतेचा पुरावा आहे. अनेकदा संघर्षांनी ग्रासलेल्या या भागाला अशा स्वरूपाचे उत्सव म्हणजे आशेचा किरण म्हणून पाहिले जातात.