सुजित तांबडे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे पक्षबांधणीसाठी राज्यात दौरे करत असताना, पुण्यात मात्र कार्यकर्त्यांना मरगळ आली आहे. मरगळलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा बळ मिळण्यासाठी भाजपबरोबर छुपी युती करण्याऐवजी उघड मैत्री करा, असा आग्रह पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी धरला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला पूर्वीचे दिवस आणायचे असतील, तर भाजपबरोबरचे संबंध उघड करावे लागतील, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

हेही वाचा… नागपुरातील संघ मुख्यालयावर मोर्चा काढण्याचे कारण काय?

पक्षाची सद्यस्थिती आणि आगामी काळातील व्यूहरचनेविषयी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका मांडली. कोणतीही निवडणूक आली की, मनसेची भाजपबरोबर हातमिळवणी किंवा छुपी युती असल्याची चर्चा होत असते. त्याचा फटका मनसेला कायम बसत आला आहे. अनेकदा ‘मैत्रीपूर्ण लढत’ या नावाने लढत होते. त्यामध्ये मनसेचीच हानी होती. आगामी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे अधिक नुकसान टाळण्यासाठी स्पष्ट भूमिका घ्यावी, असे म्हणणे पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडले. भाजपबरोबर युती करायची असेल तर ती छुपी नको, मैत्री करायची ठरले, तर उघडपणे करावी अन्यथा स्वबळावर निवडणुका लढवून जनमत आजमावे, असेही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा… धनुष्यबाण तातडीने आम्हाला द्या अन्यथा तातडीने गोठवा;  शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे धाव

खांदेपालट करूनही कार्यकर्ते थंड

शिवसेनेची दोन गटांमध्ये विभागणी झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा मनसेने घेणे अपेक्षित असताना पुण्यात मनसे ही बघ्याच्या भूमिकेत आहे. कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर करण्यासाठी खांदेपालट करण्यात आले आहे. माजी नगरसेवक वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवून माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी हेमंत संभूस आणि अजय शिंदे हे दोन शहराध्यक्ष नेमण्याचा प्रयोग करण्यात आला होता.

हेही वाचा… Maharashtra News Live : ‘धनुष्यबाण’ कोणाचा? आज होणार निर्णय; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर

खांदेपालट झाल्यानंतर मनसे जोमाने कामाला लागेल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, अद्यापही मनसेचे कार्यकर्ते थंडच आहेत.