दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपेक्षेप्रमाणे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे सांगली जिल्ह्याची पालकत्वाची जबाबदारी आली. याचा फायदा भाजपला पक्ष विस्तारासाठी करण्यासाठी कितपत होउ शकतो हे येणारा काळच सांगेल, मात्र, वर्षावर आलेल्या महापालिका निवडणुकीबरोबरच तत्पुर्वी होणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवेळी राजकीय लाभ उठविण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी पालकमंत्र्यांचा वकूबही महत्वाचा ठरणार आहे.

हेही वाचा >>> विदर्भातील ११ पैकी आठ जिल्हे भाजपच्या अधिपत्याखाली

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांना किमान मंत्रीपदाची संधी मिळाली असती तर त्यांच्या नावाचा आग्रह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून धरला गेला असता. मात्र, अपेक्षेपेक्षा वेगळं घडत त्यालाच राजकारण म्हटले जाते याचा अनुभव राज्यातील सत्ताबदलानंतर आलाच आहे.मंत्री खाडे यांचे मूळ गाव तासगाव तालुक्यातील पेड असले तरी त्यांचा मुंबईतील दास कंपनीचा व्याप सांभाळत त्यांनी जत मतदार संघात आपले राजकीय भविष्य अजमावण्याचा यशस्वी प्रयत्न केला. जत मतदार संघ खुला होताच त्यांनी मिरजेची वाट पकडली. त्यामुळे आरक्षित मतदार संघात बस्तान बसविणे, त्यासाठी राजकीय तडजोडी स्वीकारून पुढे जाणे हेच त्यांचे ध्येय असते. निवडून येण्यासाठी ज्या काही युयत्या कराव्या लागतात, त्या करण्यात त्यांचा हातखंडा आहे. यातूनच त्यांनी मिरज मतदार संघात सर्वाधिक जिल्हा परिषदेच्या जागा जिंकल्या, या ताकदीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही मिरजेसाठी मिळवून दिले. पंचायत समितीमध्येही त्यांनी भाजपच्या सत्तेसाठी प्रयत्न केले. यात खासदार संजयकाका पाटील यांची साथही मोलाची ठरली होती.

हेही वाचा >>> हुश्य.. सत्तार तर नाहीत ना? औरंगाबादकरांचा सुस्कारा

गेल्या तीन वर्षापासून विकास कामे रखडल्याचा आरोप करणार्‍या खाडेंना विकास कामे गतीने पूर्ण करण्याची संधी आता पालकमंत्री पद मिळाल्याने चालून आली आहे. स्व. पतंगराव कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालयाची इमारत, कुंडलची वन अकादमी आदी नजरेत भरण्यासारखी कामे पूर्ण केली आहेत. आता खाडे यांच्यापुढेही विकास कामे पूर्णत्वाला नेण्याचे आव्हान असेल. यामध्ये कवठेमहांकाळ तालुययातील रांजणीचा ड्राय पोर्ट, चांदोली पर्यटन स्थळ याचा विकास करायचा आहे, तसाच गेली पाच वर्षे रखडलेला मिरजेतील राष्ट्रीय महामार्गाचे काम असेल. महापालिकेतील रस्त्यांची अवस्था एखाद्या गावकुसातील रस्त्यासारखी झाली आहे.

हेही वाचा >>> आजी-माजी खासदारांचा कलगीतुरा अन् भाजपचे ‘मिशन शिरूर’

ही आव्हाने पेलत असतानाच पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देत पक्ष विस्तारासाठीही प्रयत्न करावे लागणार आहेत. आतापर्यंत त्यांनी केवळ मिरजेपुरताच विचार केला होता. आता जिल्ह्याचा विचार करावा लागणार आहे. आतापर्यंत त्यांचा वेगळा असा गट पक्षामध्ये नाही. मात्र, निष्ठावंत गटाकडून त्यांना कितपत साथ मिळते हेही महत्वाचे ठरणार आहे. केवळ बदल्या आणि मयतेदारी यातच त्यांचा वेळ चालला तर जिल्ह्याच्यादृष्टीने आणि पक्षाच्या दृष्टीनेही तो आत्मघातच ठरणार आहे. सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटालाही ते कितपत न्याय देतात हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण सत्तेत भागीदार असलेल्या शिंदे गटाचे आमदार अनिल बाबरही अद्याप मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The challenge for the new guardian minister is to bring success to the bjp in sangli print politics news amy
First published on: 25-09-2022 at 15:27 IST