बिहार विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून जोरदार तयारी सुरू आहे. बिहार भाजपा आणि एनडीएतील घटक पक्ष मिळून या निवडणुकांची तयारी करत आहेत. मात्र, निवडणुकीच्या तोंडावरच भाजपा नेत्याने पक्षातून राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. राजीनामा देणारे मनीष कश्यप कोण आहेत? त्यांच्या राजीनाम्याचा बिहार भाजपावर काय परिणाम होणार? राजीनाम्याचे कारण काय? जाणून घेऊयात.

मनीष कश्यप यांचा राजीनामा

लोकप्रिय यूट्यूबर मनीष कश्यप यांनी भारतीय जनता पक्षातून (भाजपा) अधिकृतपणे राजीनामा दिला आहे. फेसबुक लाईव्ह सत्रादरम्यान त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. एक भावनिक भाषण देत मनीष कश्यप यांनी जाहीर केले की, ते आता पक्षाचे सक्रिय सदस्य नाहीत. “भाजपामध्ये असताना मी स्वतःचे रक्षण करू शकलो नाही. मी इतरांना कशी मदत करू शकतो?” असे म्हणत त्यांनी आपल्या भावनिक भाषणातून पक्ष सोडण्याचे कारण स्पष्ट केले.

लोकप्रिय यूट्यूबर मनीष कश्यप यांनी भारतीय जनता पक्षातून (भाजपा) अधिकृतपणे राजीनामा दिला आहे. (छायाचित्र-जनसत्ता)

कश्यप यांनी आपण पक्षाकडून निराश असल्याचे संकेत दिले. त्यांनी म्हटले की, पक्षातील त्यांची भूमिका निष्प्रभ झाली आहे. गेल्या महिन्यात पटना मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (पीएमसीएच) मध्ये काही ज्युनियर डॉक्टरांनी मनीष कश्यप यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांनी असेही म्हटले की, ते आता इतर व्यासपीठांवरून आणि वेगवेगळ्या मार्गांनी आवाज उठवत राहतील. कश्यप यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत लढण्याची शक्यतादेखील दर्शविली, मात्र याबाबत त्यांनी फारशी माहिती दिली नाही. गेल्या वर्षी मनीष कश्यप भाजपा नेते मनोज तिवारी आणि अनिल बलुनी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात (भाजपा) सामील झाले होते.

कोण आहेत मनीष कश्यप?

  • मनीष कश्यप यांनी २०२० मध्ये बिहारच्या चंपाटिया विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
  • नामांकनपत्रात मनीष यांनी त्यांचे नाव त्रिपुरारी कुमार तिवारी असे नमूद केले होते. हे नाव त्यांचे अधिकृत नाव आहे.
  • त्यांनी २०१६ मध्ये आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.
  • बिहारमधील स्थलांतरित कामगारांना तामिळनाडूमध्ये त्रास दिला जात असल्याचा व्हिडीओ अपलोड केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती.
  • या अटकेनंतर ते प्रसिद्धीझोतात आले.
  • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली होती.

मनीष कश्यप यांच्याभोवतीचा वाद

मनीष कश्यप यांनी बिहारमधील स्थलांतरित कामगारांना तामिळनाडूमध्ये त्रास दिला जात असल्याचा व्हिडीओ पोस्ट केल्याने ते वादात अडकले होते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी राज्यातील स्थलांतरित कामगारांच्या छळाचे आरोप फेटाळून लावले होते. मुख्य म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना स्पष्ट केले की, बिहारमधील कामगारांना लक्ष्य केले जात नाही. या प्रकरणाविषयी बोलताना तामिळनाडूचे पोलिस उपमहानिरीक्षक (डीजीपी) शैलेंद्र बाबू म्हणाले, “बिहारमधील कोणीतरी तामिळनाडूमध्ये बिहारमधील स्थलांतरित कामगारांवर हल्ला होत असल्याचा खोटा आणि दिशाभूल करणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते पुढे म्हणाले की, या घटनेबाबत सोशल मीडियावर फिरत असलेले दोन व्हिडीओ खोटे आहेत. व्हिडीओमधील तथ्ये विकृत करून दाखवण्यात आली आहेत आणि तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या स्थलांतरित कामगारांवर हल्ला होत असल्याचे सांगण्यात आले आहे.” खोट्या व्हिडीओप्रकरणी मनीष कश्यप यांना अटक करण्यात आल्याच्या काही दिवसांनंतर मद्रास उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.