पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण भरले असून,  धरणाच्या सांडव्यातून सकाळी १० वाजल्यापासून २ हजार २०० क्युसेक पाण्याच्या विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर  पवना नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. पवना धरण पाणलोट क्षेत्रात मगाील २४ तासात ८२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यातील गावांना पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. यावर्षी पहिल्यांदाच धरण जवळपास ओव्हर फ्लो झाले असून नदी पात्रात २ हजार २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवडकरांना गतवर्षी पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर तरी पाणी कपातीचा निर्णय महानगर पालिका मागे घेते का? हे बघावे लागणार आहे.

पवना धरण पाणलोट क्षेत्रात महिनाभरापासून  समाधानकारक पाऊस झाला असला, तरी गतवर्षीच्या तुलनेत हा पाऊस कमीच मानला जात आहे. यावर्षी १ जून ते ३०ऑगस्ट पर्यंत १ हजार ५४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ३ हजार १५४ मिलिमीटर पावसाची नोंद होती. या आकडेवारीवरून यावर्षीचा मावळ परिसरातील पाऊस फारच कमी असल्याचे दिसत आहे. मागील २४ तासात धरणाच्या पाणी साठ्यात ३.५६ टक्के वाढ झाली आहे. तर १ जून पासून आजतागायत ६२.७१ टक्के धरणाच्या पाण्यात वाढ झाली आहे.