पुणे : ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीत जागावाटपात अडचण आली, तर पवार साहेबांचा सल्ला घेऊ,’ अशी खोचक टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे) महायुतीत जागावाटप व्यवस्थित होईल, असे वाटत नाही, अशी शंका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थित केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘अडचण आली, तर त्यांचा सल्ला घेऊ,’ असे उत्तर दिले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी आणि महायुतीत सहभागी असलेले पक्ष स्वतंत्र लढविणार, की एकत्र, यावर जोरदार चर्चा सुरू आहे. पत्रकारांशी शनिवारी अनौपचारिक गप्पा मारताना, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढवावी, असे वाटते,’ असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले होते. तसेच, ‘महायुतीत काही आलबेल नाही. जागावाटप व्यवस्थित होईल, असे वाटत नाही,’ असेही त्यांनी म्हटले होते. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, ‘जागावाटपात अडचण आली, तर पवारसाहेबांचा सल्ला घेऊ,’ अशी टिप्पणी केली.

‘कायदा मोडेल त्याला सोडणार नाही’

‘पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला त्रास देणारा भाजपचा कार्यकर्ता असो अथवा इतर कोणत्याही पक्षाचा, कायदा हा सर्वांना सारखाच आहे. जो चुकीचे वागेल, त्याच्यावर कारवाई केली जाणारच. त्याला कोणीही पाठीशी घालणार नाही,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘त्यांना आधी एकत्र तर येऊ द्या’

उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येत असल्याच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, ‘त्यांना आधी एकत्र येऊ द्या, मग त्यावर बोलणे योग्य होईल. त्यांच्यामध्ये जेवढी चर्चा नाही तितकी चर्चा प्रसारमाध्यमांमध्येच सुरू आहे. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देऊन मला ‘बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना’ व्हायचे नाही.’